आयुष्मान भारत योजना अन् महात्मा फुले आरोग्य योजना यांचे एकत्रीकरण होणार!
![Ayushman Bharat Yojana and Mahatma Phule Arogya Yojana will be merged](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Ayushman-Bharat-Yojana-and-Mahatma-Phule-Arogya-Yojana-780x470.jpg)
मुंबई : आयुष्यमान भारत आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा फुले आरोग्य योजना यांचे एकत्रीकरण होणार आहे. राज्यातील १२ कोटी नागरिकांना आता मोफत आरोग्यसुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार केले जाणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
केंद्राच्या यादीप्रमाणे १९०० आजार यात समाविष्ट करून येत्या १ महिन्यात १ कोटी आणि ६ महिन्यात १० कोटी लोकांना हे कार्ड वितरित करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा फुले जन आरोग्य योजना समन्वयातून राबविल्यास राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट होणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना अधिकचा लाभ देणे शक्य होईल. राज्यात सार्वजनिक रूग्णालय एकत्र आणून त्यांच्यासाठी प्रोत्साहन निधी देण्याची योजना तयार करावी. आयुष्मान भारत डिजिटल मिशन राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडकरांवर पाणी कपातीचे संकट कायम, महापालिका घेणार ‘हा’ निर्णय
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपालकृष्णन, उपसंचालक रोहित झा यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या एकत्रित आरोग्य योजनेच्या एक कोटी आरोग्य कार्डाचे वाटप ऑगस्टपर्यंत तर १० कोटी आरोग्य कार्डे पुढील सहा महिन्यात वाटले जाणार आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय म्हणाले.