हृदयविकाराच्या रुग्णांसाठी जिल्हास्तरावर अतिदक्षता विभाग
मुंबई | महाईन्यूज
हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्याने होणारे संभाव्य मृत्यू रोखण्यासाठी राज्यातील जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांत दोन खाटांचे अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहेत. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना तातडीने उपचार या विभागात दिले जातील. पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्य़ांमध्ये ही योजना सुरू केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे.
स्टेमी प्रकल्पाअंतर्गत पुणे, नागपूर, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सोलापूर आणि वर्धा या जिल्ह्य़ांमध्ये ११० जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी दोन खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे. तपासणीसाठी ‘ईसीजी’ यंत्रासह तंत्रज्ञही उपलब्ध केला जाईल. रुग्ण दाखल झाल्यानंतर तात्काळ ‘ईसीजी’ तपासणी करून हृदयविकाराचा झटका आला आहे का, याची शहानिशा केली जाईल. तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘क्लाऊड कनेक्टिव्हिटी’च्या माध्यमातून याचा अहवाल तज्ज्ञांकडे पाठविला जाईल. तज्ज्ञांद्वारे औषधोपचारांबाबत त्वरीत मार्गदर्शन केले जाईल. तसेच झटका आलेल्या रुग्णाच्या शरीरातील रक्ताची गुठळी पातळ करण्याचे औषध (थ्राँबोलिसिस) देण्याची सुविधाही उपलब्ध असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.