आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?; मनसेचा आव्हाडांना टोला
चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले?
मुंबई : बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानच्या पठान चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक वादानंतर अखेर पठान चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र, प्रदर्शनानंतरही या चित्रपटावरून पुन्हा एकदा राजकीय वाद सुरू झाला आहे. मनसेकडून याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी हर हर महादेव या मराठी चित्रपटावरून मोठआ वाद निर्माण झाला होता. चित्रपटातील काही दृष्य आणि संवादांवर आक्षेप घेत इतिहासाची मोडतोड केल्याचा दावा करत जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी ठाण्यातील एका मॉलमध्ये चित्रपटाचा शो बंद पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटकही करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. या प्रकरणाचा संदर्भ देत मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली आहे.
‘हर हर महादेव’ वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’ मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.
पठान चित्रपटावरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद पाहायला मिळत आहे. आधी दीपिका पदुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वाद झाला होता. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही भाग कट करण्यात आला. मात्र पठान चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर पठाननं मोठी कमाई केली आहे.