#AtmanirbharBharat : आत्मनिर्भर भारत अभियानासाठी संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय; परकीय साधणसामुग्री आयातीवर बंदी!
नवी दिल्ली । टीम ऑनलाईन
आत्मनिर्भर भारत अभियानाला सक्षम करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. संरक्षण विभाग आता निर्धारित कालमर्यादा घातलेल्या १०१ साधण-सामुग्रीसाठी दिलेल्या मुदतीच्या पुढे आयातीवर बंदी घालणार आहे. संबंधित साधणांचे देशातच उत्पादन करण्यावर भर देण्यात येईल, अशी घोषणा देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज केली.
सिंग म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, यंत्रणा, लोकसंख्या शास्त्र आणि मागणी ही पंचसूत्री देशाला दिली आहे. त्यासाठी स्वावलंबी देश घडवण्याच्या उद्देशाने आर्थिक पॅकेजही दिले आहे.
स्वावलंबी संरक्षण विभागाच्या दृष्टीने आढावा घेत, या विभागाने १०१ वस्तूंची यादी तयार केली असून त्यासाठी आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे. संरक्षणातील आत्मनिर्भरतेसाठी हे एक मोठे पाऊल आहे.