वॉर्ड आरक्षित झाल्याने काँग्रेस नेता खवळला, सुपारी घेतलीये म्हणत थेट आयुक्तांवर हल्लाबोल
मुंबई : मुंबई महानगरपाका निवडणुकीसाठीची वॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षणात गेले आहेत. यावरुन आता काँग्रेस नेते आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ‘यामागे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे आहेत. आयुक्तांनी मुंबईतून काँग्रेस संपवण्याची सुपारी घेतली आहे’, असा खळबळजनक आरोप रवी राजा यांनी केला आहे.
रवी राजा हे गेली ३० वर्ष नगरसेवक असून त्यांच्यासह अश्रफ आझमी आणि अन्य काही नगरसेवकांच्या वॉर्डातील आरक्षण बदलले आहे. प्रभाग पुनर्रचनेत काँग्रेसच्या वॉर्डना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले आहे. हे आम्ही पहिली आणि दुसरी पुनर्रचना जाहीर झाली तेव्हाच निदर्शनास आणून दिले होते, असंही त्यांनी सांगितलं.
आयुक्तांच्या मनमानी कार्यपद्धतीला काँग्रेसने कायम विरोध केला आहे. प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतरही आयुक्तांची मनमानी थांबलेली नाही. छुप्या पद्धतीने अनेक महत्त्वाचे निर्णय ते घेत आहेत. अनेक प्रस्तावांना आम्ही विरोध केला, ते आयुक्तांनी मंजूर केले. त्याचा सूड आयुक्तांनी उगवला आहे. या आरक्षण बदलाविरोधात काँग्रेस न्यायालयात आव्हान देणार असल्याचे रवी राजा यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीची वॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीची वॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. अनुसूचित जाती आणि महिला आरक्षणामुळे वर्षानुवर्षे निवडून येत असलेल्या नगरसेवकांना आपले वॉर्ड गमवावे लागले आहेत. सर्वच पक्षांमधील नगरसेवकांना या रचनेचा फटका बसला आहे. शिवसेना नगरसेवक अमेय घोले, काँग्रेस नेते आणि पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आणि बेस्टचे माजी अध्यक्ष व शिवसेना नेते आशिष चेंबूरकर यांना यंदा आपला वॉर्ड सोडावा लागणार आहे. अमेय घोले, रवी राजा आणि प्रभाकर शिंदे यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तर आशिष चेंबूरकर यांचा वॉर्ड अनुसूचित वर्गासाठी आरक्षित झाला आहे. याशिवाय, मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांना वॉर्ड क्रमांक ११७ हा देखील महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तर मुंबईचे माजी महापौर यांनाही त्यांचा वॉर्ड क्रमांक ९६ महिला आरक्षणामुळे गमवावा लागला आहे.