पाकिस्तानी लोकांना भाजपा नेते त्यांच्या घरी ठेवणार का? CAAवरून अरविंद केजरीवाल यांची टीका
नवी दिल्ली | केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा विधेयकाची (CAA) अधिसूचना प्रसिद्ध केली. केंद्र सरकारने ‘सीएए’बाबतची अधिकृत घोषणा केल्यानंतर पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांक नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा झाला. यामध्ये हिंदू, जैन, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन या धर्मातील अल्पसंख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकार नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी करून आपल्या हक्काच्या घरात पाकिस्तानी लोकांना बसविण्याचे काम करत आहे. सरकारी पैसा हा देशाच्या विकासासाठी खर्च व्हायला पाहिजे. मात्र, तो पैसा आता पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील लोकांना भारतात स्थायिक करण्यासाठी खर्च केला जाणार आहे. या तीन देशात जवळपास तीन कोटी लोक अल्पसंख्यांक आहेत. आता या अल्पसंख्यांकांसाठी भारताचे दरवाजे उघडतील, तसे या देशातून मोठ्या प्रमाणात लोक भारतात येतील. तीन कोटीमधून दीड कोटी लोकं जरी भारतात आले तरी त्यांना रोजगार कोण देणार? या लोकांना कोठे बसविणार? भाजपाचे नेते त्यांच्या घरी ठेवणार आहेत का? भाजपाचे नेते त्यांना रोजगार देणार का? असा सवाल उपस्थित केला.
हेही वाचा – ‘मी निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार’; विजय शिवतारे यांचं पवारांविरोधात बंड
देशातील मध्यमवर्ग महागाईने होरपळत आहेत. तरुणांना रोजगार मिळत नाही. मग हे प्रश्न सोडविण्याऐवजी केंद्र सरकारने ‘सीएए’ आणला आहे. यामुळे केंद्र सरकार पैसा पाकिस्तानी लोकांवर खर्च होणार आहे. देशात जवळपास दीड-दोन कोटी लोक येतील. पण भाजपा हे सर्व मतांचे राजकारण करत असून भाजपा हा एकमेव पक्ष आहे, मतासांठी घाणेरडे राजकारण करत आहे. मात्र, आसामसह ईशान्य भारतातील लोकांचा या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध असून जनतेचा विश्वासघात झाला आहे. जनता भाजपाला निवडणुकीत मतदान करून प्रत्युत्तर देईल, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.