breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंता वाढली!, मुंबईत करोना रुग्णवाढीचा पंधरवडा; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची सूचना

 मुंबई : विविध पातळ्यांवर सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे नियंत्रणात आलेल्या करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. प्रामुख्याने मागील १५ दिवसांत रुग्णसंख्या जलदगतीने वाढली आहे. पूर्वपेक्षा पश्चिम उपनगरामध्ये होत असलेली रुग्णवाढ किंचित अधिक आहे. त्यामुळे येथील रुग्णवाढीवर लक्ष ठेवण्याची अधिक गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

१६ ते ३१ मे या कालावधीत मुंबईमध्ये करोनामुळे एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नसला तरी मार्चमध्ये ०.३४ टक्के असलेले चाचण्यांच्या पॉझिटिव्हिटीचे प्रमाण मे महिन्याच्या शेवटच्या १५ दिवसांमध्ये ३.२ टक्क्यांवर गेले आहे. मे महिन्यात शहरात पाच हजार ८८८ रुग्णांची नोंद झाली होती. यातील चार हजार ११४ रुग्ण हे मागील १५ दिवसांत नोंदवण्यात आले आहेत. मागील दोन महिन्यांच्या तुलनेत ही वाढ तिप्पट असल्याचे दिसून येते.

तिसऱ्या लाटेनंतर मार्च व एप्रिलमध्ये करोना रुग्णसंख्या अतिशय कमी होती. मे महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत तीन जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. मात्र या दिवसांत रुग्णवाढीचा वेग तुलनेने कमी होता. दरम्यान, आतापर्यंत एक कोटी ३४ लाख ४६ हजार ९६ जणांनी संस्थात्मक विलगीकरण पूर्ण केले असून, ३७ हजार ८२८ रुग्ण घरगुती विलगीकरणात आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ३००च्या आत आहे, तर लक्षणे नसलेले रुग्ण दोन हजार ६४३ एवढे आहेत.

सहआजार असलेल्या वयोवृद्ध व्यक्तींनी अधिक खबरदारी घ्यायला हवी. तसेच प्रत्येकाने मास्कचा वापरही करणे गरजेचे आहे. ‘आयसीएमआर’ने लसीकरणासंदर्भात दिलेल्या सूचनांचे पालनही प्रत्येकाने करायला हवे, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. तर, ‘रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार वैद्यकीय तयारीही सुरू आहे. शाळा सुरू झाल्यानंतर १२ ते १४ या वयोगटातील लसीकरणावर अधिक भर देण्यात येईल’, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

‘रॅपिड अँटिजेनचे प्रमाण अधिक’

‘रॅपिड अँटिजेन चाचण्यांतून करोनाचे निदान होत असले तरी त्याची नोंद होणे गरजेचे आहे. ही नोंद झाल्यानंतर रुग्णसंख्येमध्ये किती वाढ होते, हे नेमके लक्षात येणार आहे. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे रुग्णसंख्येतील नेमकी वाढ लक्षात येत नाही’, असे पॅथालॉजिस्ट डॉ. महेश साळवी यांनी नमूद केले.

करोनासंसर्गाचा फैलाव करणाऱ्या विषाणूच्या स्वरूपामध्ये बदल झाल्याने व नागरिकांकडून करोनाप्रतिबंधक नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. संसर्गाचा वेग अधिक असला तरीही रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अद्याप वाढलेली नाही. त्यामुळे सामान्यांनी घाबरून जाऊ नये, मात्र सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

– डॉ. संजित शशीधरन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button