सर्वसामान्य जनतेला आणखी एक धक्का, तूरडाळ आणि तांदूळ महागला!
मुंबई : दिवसेंदिवस वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. पावसाअभावी महाराष्ट्रात भाजीपाल्यासोबतच सर्वकाही महागण्याची शक्यता आहे. डाळींवर तर त्याचा परिणाम आधीपासूनच दिसू लागला असून तूरडाळ किरकोळ बाजारात तब्बल 50 ते 60 रुपयांनी महागल्याचे चित्र आहे. तांदळाचे दरही ९ टक्क्यांनी वाढले आहेत.
पावसाने ओढ दिल्यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊन सोयाबीनसह अन्य खाद्यपदार्थांच्या किमतीही झपाट्याने वाढू शकतात असा अंदाज आहे. दरम्यान, साखरेपासून तांदळापर्यंत सर्वच महागले असल्याची माहिती स्थानिक दुकानदारांनी दिली आहे.
हेही वाचा – ‘आमरण उपोषण सोडायला तयार पण..’; मनोज जरांगे पाटील यांना निर्धार कायम
चार महिन्यांपूर्वी होलसेल बाजारात १२५ ते १३० रुपयांवर असणारे तूरडाळीचे दर तब्बल १७० ते १७५ रुपयांवर गेल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे. आयात तूरडाळीचे दर ८५ ते ९० रुपये होते. हे आता १५० ते १६० रुपयांवर गेल्याचे देखील त्यांनी सांगितले.
केंद्राच्या कोठारांमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत तांदळाचा साठा २.४३ मेट्रिक टन इतका होता. ऑगस्ट २०१८ नंतरचा हा सर्वात कमी साठा असल्याचे समोर आले आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये २.८ कोटी मेट्रिक टन, ऑगस्ट २०२१ मध्ये २.९१ कोटी मेट्रिक टन, ऑगस्ट २०२० मध्ये २.५३ कोटी मेट्रिक टन आणि ऑगस्ट २०१९ मध्ये २.७५ कोटी मेट्रिक टन साठा होता.