मोदींकडून आर्थिक मदतीची घोषणा, अमित शाह मराठीत म्हणाले,…
नाशिक – औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातात १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एका खासगी लक्झरी बसने अपघातानंतर पेट घेतल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी एका बाळाच्या मृतदेहासहीत दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा ११ वरुन १३ वर पोहोचला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नेतावाईकाला दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठीत ट्वीट करुन मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना खेद व्यक्त केला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही ट्वीटरवरुन आपल्या भावना मांडल्यात.
“नाशिक येथील बस दुर्घटनेबद्दल ऐकून वाईट वाटलं. ज्यांनी या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या सद्भावना आहेत. जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटल्याचं पंतप्रधान कार्यालयाच्या ट्वीटरवरुन सांगण्यात आलं आहे. तसेच, पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नेतावाईकाला दोन लाखांची मदत केली जाईल तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जातील, असंही जाहीर करण्यात आलं आहे.
Anguished by the bus tragedy in Nashik. My thoughts are with those who have lost their loved ones in this mishap. May the injured recover at the earliest. The local administration is providing all possible assistance to those affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 8, 2022
केंद्रीय गृहमंत्र्यांनी मराठीत ट्वीट करत या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. “नाशिक (महाराष्ट्र) येथील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या भीषण अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत, ते लवकरात लवकर बरे होवो अशी मी प्रार्थना करतो,” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
नाशिक (महाराष्ट्र) येथील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या भीषण अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत, ते लवकरात लवकर बरे होवो अशी मी प्रार्थना करतो.
— Amit Shah (@AmitShah) October 8, 2022
मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन, “नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे,” असं सांगण्यात आलं आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक येथील अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. #Nashik
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 8, 2022
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “नाशिकमध्ये खाजगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या आप्तजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि स्थानिक अधिकारी हे स्वतः घटनास्थळी असून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत,” असं ट्वीटरवरुन म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांना तातडीने आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या सहकारी आमदार देवयानी फरांदे या सुद्धा रुग्णालयात असून समन्वय ठेवून आहेत,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
नाशिकमध्ये खाजगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या आप्तजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 8, 2022
जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि स्थानिक अधिकारी हे स्वतः घटनास्थळी असून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. #Nashik
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीटरवरुन, “यवतमाळहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या खासगी बसला औरंगाबाद-नाशिक मार्गावर अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत,” असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी, “अपघातातील जखमींना वैद्यकीय उपचार व मृतांच्या नातेवाईकांना सरकारनं आर्थिक मदत करावी. अशा अपघातांची पुनरावृत्ती व प्रवाशांचे मृत्यू टाळण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे,” अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे.
यवतमाळहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या खासगी बसला औरंगाबाद-नाशिक मार्गावर अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 8, 2022
अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने या बसने पेट घेतल्याचे सांगितले जात आहे. अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यवतमाळहून ही बस मुंबईला निघाली होती. पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली. अपघातानंतर बसने पेट घेतला. गाठ झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरश: कोळसा झाला.