‘सरकार चहामध्ये सोन्याचं पाणी घालतं का?’ वर्षा बंगल्यावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख! अजित पवारांचा हल्लाबोल
शिंदे-फडणवीस सरकार लोकांची फसवणूक करत आहे
मुंबई : राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मागील चार महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रूपये आले आहे. सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकतो का? असा खोचक सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
विकासकामांऐवजी इतर गोष्टींवर उधळपट्टी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रूपये आलेले आहे. मी उपमुख्यमंत्री होतो. आमचे काही सहकारीदेखील मुख्यमंत्री होते. चार महिन्यात जेवणाचं बील २ कोटी ३८ लाख रूपये आले. एवढं बील कसं काय? चहामध्ये सोन्याचं पाणी वगैरे घातलं होतं का? सरकार चहात सोन्याचा अर्क टाकते का?, असा सवाल अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे.
ग्रामीण भागातील विकासासाठी दिली जाणारा निधी वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे खर्चाअभावी हा निधी परत जाणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ५२ हजार केटी रूपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. मात्र तिजोरीचा विचार न करता, केवळ मंत्री आणि त्यांच्या आमदारांच्या मतदारसंघात कोट्यवधींची कामे जाहीर करण्यात आली. मात्र तेवढा निधी सरकारकडे नाही. ही लोकांची फसवणूक आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
कांद्याला भाव नाही. बार्शीतील शेतकऱ्याला २ रूपयांचं चेक मिळणं दुर्दैवी आहे. विकासकामं सोडून इतर गोष्टीवर खर्च केला जात आहे. जाहीरातींवर कोट्यावधींचा खर्च केला जात आहे. लाच दिल्याशिवाय काम होत नाहीत, असंही अजित पवार म्हणाले.