Uncategorizedताज्या घडामोडीमुंबईराजकारण

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना आणि भाजपने आपले लक्ष आता मुंबई महापालिका निवडणूक जिंकूच-शिवसेना भाजपचा दावा

मुंबई | राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना आणि भाजपने आपले लक्ष आता मुंबई महापालिका निवडणुकीवर एकवटले आहे. शिवसेनेला अखेरचा दणका देण्यासाठी आगामी महापालिका निवडणूक जिंकण्याचा चंगच भाजपने बांधला आहे. शुक्रवारी पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत भाजप नेते आशिष शेलार यांनी, मुंबईचा पुढील महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास व्यक्त केला. आपली लढत शिंदे गटाशी नसून भाजपशीच असल्याचे स्पष्ट करून मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत शिवसेना जिंकणारच, असा आत्मविश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

‘शिवसेनाच जिंकणार’

‘मुंबई महापालिका निवडणूक कोणत्याही परिस्थितीत शिवसेना जिंकणारच आणि तेही तुम्हा सर्वांच्या जीवावर,’ असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. एकनाथ शिंदे गटाला महत्त्व न देता महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा, असा आदेश देतानाच आपली लढत शिंदे गटाशी नव्हे, तर भाजपशीच असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक शिवसेना भवनमध्ये पार पडली. महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने माजी नगरसेवकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी बिहारमधील राजकीय घडामोडींवर तसेच शिंदे गटावर भाष्य केले. ‘विरोधी पक्षापेक्षा मित्रपक्षांना आधी संपवणे हे भाजपचे धोरण मला सन २०१९मध्येच समजले होते. त्यामुळेच मी वेगळा झालो. जे मला २०१९ला समजले ते बिहारच्या नितीश कुमार यांना आता कळले,’ असे वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचे शुक्रवारी स्वागत केले.

‘शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार, खासदार निवडून येऊच शकत नाहीत. गेल्या महापालिका निवडणुकीतही आपण भाजपविरोधात लढलो आणि जिंकलो. त्यामुळे या निवडणुकीतही आपणच जिंकणार,’ असा दावा ठाकरे यांनी केला. गेल्या वर्षी मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. तेव्हाही शिवसेना जिंकली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीतही असेच चित्र राहील. त्यासाठी स्थानिक पातळीवरील संपर्क, लोकांचे प्रश्न आणि संघटन यावर भर द्या, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना दिला.

‘मुंबईचा महापौर आमचाच’

‘मुंबईकरांना जो बदल अपेक्षित आहे, तो आता होणार आहे. मुंबईचा पुढील महापौर आमचाच होणार आहे,’ असा विश्वास भाजपचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. भ्रष्‍टाचारी व्‍यवस्‍थेला तडीपार करण्‍यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्ठा करणार असल्याचे स्पष्ट करून त्यांनी जणू महापालिका निवडणुकीचे रणशिंगच शुक्रवारी फुंकले.

मुंबईचे माजी अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीने अॅड. आशिष शेलार यांची मुंबईच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड केली. या निवडीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील विश्वास व्यक्त केला. या वेळी शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय अध्‍यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील, नवनिर्वाचित प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मावळते मुंबई अध्‍यक्ष मंगलप्रभात लोढा या सर्वांचे आभार मानले.

‘मुंबईकरांसाठी आम्‍ही गेली दोन दशके ज्‍यांच्‍याबरोबर संघर्ष केला, त्‍या भ्रष्‍टाचारी व्‍यवस्‍थेला तडीपार करण्‍यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्ठा करीन. तसेच केंद्रीय भाजपला मुंबईत जे काम अपेक्षित आहे ते करत यश संपादन करून देण्‍याचा प्रयत्‍न आम्‍ही करू. त्‍यासाठी मुंबईतील भाजपचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची मोठी चमू असून आम्ही सगळे मिळून भाजपचाच महापौर महापालिकेत बसवू,’ असे शेलार यांनी या वेळी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button