पंतप्रधानांकडून गुजरातची हवाई पाहणी
- तौक्ते चक्रीवादळाचे राज्यात ४५ बळी
नवी दिल्ली |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात व शेजारच्या दीव व दमण या भागांची तौक्ते वादळानंतर हवाई पाहणी केली. मोदी यांनी गुजरातमध्ये तौक्ते वादळामुळे झालेल्या हानीचा आढावा घेतला. मोदी दिल्लीहून दुपारी भावनगर येथे आले व तेथून उना, दीव, जाफराबाद, महुवा या भागांच्या हवाई पाहणीसाठी रवाना झाले. गीर सोमनाथ, भावनगर, अमरेली, दीव यांची हवाई पाहणी त्यांनी हेलिकॉप्टरमधून केली.
दीव येथे वादळाने जमिनीला स्पर्श केला होता व नंतर सोमवारी रात्री वादळ गीर-सोमनाथ जिल्ह्णात गेले. त्या भागात मोठ्या प्रमाणात मालमत्तेची हानी झाली असून पंतप्रधान हवाई पाहणीनंतर अहमदाबाद येथे बैठक घेणार आहेत. गुजरातमध्ये तौक्ते वादळाने ४५ जण ठार झाले असून किनारी भागातील घरांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले. उत्तर गुजरातमध्ये सौराष्ट्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. गुजरातेत एकूण १६ हजार घरे, ४० हजार वृक्ष, ७० हजार विजेचे खांब कोसळले असून ५९५१ शहरांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिली.