‘टाटा-एअरबस’प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरूच
मुंबई, ठाणे, नंदुरबार : टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये शनिवारीही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत दिशाभूल करीत असल्याचा आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर विरोधकांना उत्तर देण्यासाठी वेदांता-फॉक्सकॉन, एअरबस-टाटा यांसह अन्य प्रकल्पांची माहिती देण्यासाठी लवकरच श्वेतपत्रिका काढण्यात येईल, अशी घोषणा उदय सामंत यांनी ठाणे येथे केली. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार येथे बोलताना, ‘‘गरज पडल्यास मी याप्रकरणी विरोधकांना उत्तर देईन,’’ असे सांगितले.
वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ एअरबस-टाटा यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा प्रकल्पही गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेचा भडीमार सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत, तर उद्योगमंत्री सामंत यांनी, ‘तत्कालीन सरकारने प्रकल्प राज्यात राहावेत म्हणून काय प्रयत्न केले, त्याची कागदपत्रे द्यावीत, असे आव्हान विरोधकांना दिले आहेत.