‘सर्व राजकीय पक्षांना घरी बसवा आणि २०२४ ला महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या’; अभिजित बिचुकले
अभिजीत बिचुकले तुम्हाला एक चांगला पर्याय म्हणून आहे
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजुने निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं. यावर अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. या पार्श्वभूमीवर बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मी लोकशाही मानणारा नागरिक आहे. लोकांनी निवडूण दिलेले प्रतिनिधी तिथे जातात. मला अद्याप लोकांनी निवडूण दिलं नाही. त्यामुळे येत्या काळासाठी मी एवढंच सांगेन की, जे झालं ते पुरेसं झालं. आता हे कुणीही असतील शिवसेना उद्धव ठाकरे गट असो वा शिवसेना एकनाथ शिंदे गट असो, जो कुणी असेल त्या सगळ्या पक्षांना एकदा घरीच बसवा. अभिजीत बिचुकले तुम्हाला एक चांगला पर्याय म्हणून आला आहे. अभिजित बिचुकले अतिशय परखड मतं देणारा, कुणालाही न घाबरणारा आणि पूर्णपणे निर्व्यसनी आहे. माझी कोणतीही बायलॉजिकल चाचणी करा. मी पूर्णपणे निर्व्यसनी आहे. मी फक्त जेवण करतो, अशी प्रतिक्रिया बिचुकले यांनी दिली आहे.
असलं राजकारण थांबवायचं जनतेच्या हातात आहे. देशाची राजधानी दिल्ली भाजपच्या ताब्यात नाही किंवा काँग्रेसच्या ताब्यात नाही. उद्धव ठाकरे गट असो वा एकनाथ शिंदे गट असो, अशा सर्व राजकीय पक्षांना घरी बसवा आणि २०२४ ला महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या, असं विधान अभिनेते अभिजीत बिचुकले यांनी केलं आहे.
गंमत अशी आहे की, मी न्यायव्यवस्थेबद्दल बोलणार नाही. जेव्हा मला न्याय व्यवस्थेबद्दल बोलायची वेळ येईल. तेव्हा मी ते सत्र न्यायालय असेल तर मी उच्च न्यायालयात जाईन, खटला उच्च न्यायालयात असेल तर मी सर्वोच्च न्यायालयात जाईन. सर्वेच्च न्यायालयातील न्यायव्यवस्थाही न्याय देत नसेल तर मी राष्ट्रपतींचा दरवाजा ठोठावेन, कारण राज्यघटनेत तशी तरतूद आहे, असंही बिचुकले म्हणाले.