आरारा खतरनाक! नद्यांमधून वाहत होते १८ लाकडाचे लठ्ठे, तपास करताच अधिकारी चक्रावले
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग हे मौल्यवान सागवानसाठी प्रसिद्ध आहे. तीन राज्यांची सीमा असल्याने या वनविभागातील मौल्यवान सागवान जंगलावर परराज्याची विशेषतः तेलंगाणाची वक्रदृष्टी पडली आहे. त्यामुळेच येथे सागवान तस्करी सुरूच आहे. सध्या सिरोंचा तालुक्यात पूरपरिस्थिती आहे. तालुक्यातील विविध नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीतही नदी नाल्यातून सागवान तस्करी केली जात आहे. मात्र, यावेळी वनविभागाने धाडसी कारवाई करत १८ सागवान लठ्ठे पकडले. तस्करांचा यावेळी डाव फसला असला तरी ‘पुष्पा’ अजूनही झुकला नाही, असंच म्हणावं लागेल.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी देचली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पेरकाभट्टी नियत क्षेत्रात वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना मौजा खम्मासूर जवळील नालापात्रातून तब्बल १८ सागवान लठ्ठे पकडण्यात आले. यात एकही आरोपी मिळाले नसले तरी लाखो रुपयांचा सागवान पकडण्यात वन विभागाला यश आले. सध्या नदी-नाल्यांना पूर आल्याने जंगलातील मौल्यवान सागवान लठ्ठे वाहून जाताना सर्वांनाच दिसत आहे. मात्र, हे सागवान लठ्ठे वन विभागाने कापून बिटात साठवलेले आहे की तस्करीसाठी अवैधरित्या कापलेले आहे ? हे तर चौकशीअंतीच समोर येईल. सध्या याचा तपास वनविभाग करीत आहे.
सिरोंचा वन विभागात सिरोंचा परिसरातील नदी, नाले तुडुंब भरून वाहतानासुद्धा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त घालून केलेली ही कारवाई धाडसीच म्हणावे लागेल. या भागात सुरू असलेली सागवान तस्करी आणि सक्रिय असलेली आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केव्हा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यापूर्वी सुद्धा अनेक कारवाया झाल्या. मात्र, ‘पुष्पा’ला झुकविण्यात वन विभागाला अजूनही यश आले नाही.