पुण्यात तरूणीला वाचवणाऱ्या तरूणांची जितेंद्र आव्हाड यांच्याकडे एक मागणी
पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत एका तरूणीवर भरदिवसा कोत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी लेशपाल जवळगे, हर्षद पाटील आणि दिनेश मडावी या तीन तरुणांनी जीवाची बाजी लावत तरूणीचा जीव वाचवला. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या मुलांसाठी ५१ हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केले होते. काल त्यांनी त्या तरूणांची भेट घेतली. यानंतर त्यांनी एक ट्वीट केलं आहे. दरम्यान, त्यांच्या या ट्वीटची चांगलीच चर्चा होत आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, पुण्यात माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात, एका तरुणीचा जीव वाचणाऱ्या तीन जिगरबाज योद्ध्यांना आज भेटलो. लेशपाल जवळगे, हर्षद पाटील, दिनेश मडावी या तीन तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावत एका तरुणीचा जीव वाचवला. इतकंच नव्हे तर हल्ला करणाऱ्या तरुणाचा जीव देखील या युवकांनी वाचवला आहे. या तिघांसोबत गप्पा मारत असताना एक गोष्ट मात्र जाणवली आणि सुखद धक्का बसला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारी ही मुलं आहेत. सदर घटना घडल्यानंतर ते अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले. अनेकांनी त्यांची काळजी पोटी चौकशी केली. परंतु अनेकांनी त्या हल्लेखोरांची जात विचारून त्यांना हैराण केले. मुलीची जात विचारून तिची ओळख नेमकी काय आहे,हे विचारण्या पर्यंत काही लोकांची मजल गेली.
हेही वाचा – कोयता गँगकडे दुर्लक्ष करणं पडलं महागात, वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सात कर्मचारी निलंबित
https://twitter.com/Awhadspeaks
ते पुढे म्हणाले की, या प्रकाराने ही मुलं दुःखी दिसली. याबद्दल बोलताना त्यांचा सामूहिक सुर असा दिसला की,आम्ही जात बघून त्या मुलीला वाचवलं नाही. आमच्या समोर एका मुलीचा जीव जातोय आणि अश्या वेळी आम्ही षंढासारखे गप्प बसू शकत नव्हतो. आपल्या बहिणीची रक्षा केली पाहिजे, या विचाराने आम्ही तिचा जीव वाचवला…! विचारांनी प्रगल्भ आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार समर्थपणे पुढे घेऊन जाणारे हे वाघ आहेत. अशी तरुण मंडळी या समाजात मोठ्या संख्येने निर्माण झाली तर आपल्या राज्याचं भविष्य नक्कीच उज्वल असेल, यात शंका नाही. मी शब्द दिला होता त्याप्रमाणे, तिघांना पारितोषिक दिलं आहे. या तिन्ही मुलांनी एक प्रेमळ आणि हक्काची मागणी केली की, त्यांना पवार साहेबांना भेटायचं आहे..! आणि लवकरच मी त्यांची ही मागणी देखील पूर्ण करणार आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.