रिक्षाचालक संघटनांमध्ये मोठा वाद..! नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बाबा कांबळेंना आंदोलन समितीतून वगळलं
पुणे : पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा संघटनेनी आक्रमक भूमिका घेत 28 नोव्हेंबर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील रिक्षाचालक संघटनांनी एकत्रित येऊन बेमुदत संप पुकारला. यातच मात्र बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समितीने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी समितीने महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांना आंदोलन समितीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समिती मधून बाबा कांबळे यांना वगळण्याचा निर्णय 16 संघटनांनी एकमताने घेऊन 30 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत घेतला आहे. त्यामुले या आंदोलन समितीत 17 ऐवजी 16 संघटना राहणार आहेत. तसेच रिक्षाचालकांच्या प्रश्नांप्रती बेशिस्त व अप्रामाणिक अशी कोणतीही कृती आंदोलन समिती खपवून घेणार नसल्याचंही समितीने सांगत बाबा कांबळे यांनी समितीतून हाकलण्यात आलं आहे.
यामध्ये समितीने बाबा कांबळे यांच्यावर वेगवेगळे आरोप लावले आहेत. यामध्ये जाणून बुजून पत्रकार बांधवांसमोर वाद उकरून काढून आंदोलनात फूट पाडणे, समितीला अंधारात ठेऊन परस्पर परिवहन अधिकारी व आंदोलनाशी संबंधित बाईक टॅक्सी बाबत इतर अधिकारी यांची परस्पर भेट घेऊन पारदर्शक कार्यपद्धतीच्या नियमांचा भंग करणे, आंदोलन सुरू असताना मध्येच निघून जाणे, आंदोलनाची कायदेशीर जबाबदारी सर्वांची सामायिक असेल हे लेखी मान्य करून सुद्धा आंदोलनानंतर गुन्हे दाखल झाल्यावर संताप करून त्याचे खापर इतरांवर फोडणे, आंदोलनात ठरवून बोलायची वेळ दिलेली असताना दोन दोन वेळा एक एक तास भाषण केल्याने इतर रिक्षाचालाकांना व्यक्त होण्याची संधी न मिळणे असं त्या समितीने म्हटलं आहे.
त्याचबरोबर आंदोलन समितीचा एकच प्लेक्स लागेल हे ठरलेले असताना प्रादेशिक परिवहन विभाग परिसरात स्वत: चे अनेक फ्लेक्स लावून आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करणे व समितीमधील वातावरण दुषित करणे, आंदोलन समितीमध्ये वारंवार वैयक्तिक वाद उकरून काढून चर्चेचा स्तर खालावणे, असा ठपका बाबा कांबळे यांच्यावर समितीने ठेवले आहे.
दरम्यान, चुकीचा संदेश पसरवून 12 लाख रिक्षा चालकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असणाऱ्या या आंदोलनाला कमजोर करणाऱ्या प्रति कोणतीही हायगय केली जाणार नाही. याबाबत आंदोलन समितीतील सर्व सभासद ठाम आहेत व त्यांच्यामध्ये एकजुट आहे. तसेच कोणत्याही प्रकारची फुट नाही. तसेच यापुढे आंदोलन समितीच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सदर संघटनेचा समावेश नसेल असं देखील आंदोलन समितीने म्हटलं आहे. दरम्यान, कोवीडनंतर अनेक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनानंतर त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्यानंतर अनेक पुणेकरांनी बाईक टॅक्सी किंवा कॅबला प्राधान्य दिलं. त्यामुळे रिक्षाचालक संतापले आहेत. एका भाकरीमध्ये शंभर तुकडे सरकार करत असल्याचा आरोप रिक्षाचालक संघटनांनी केला आहे.