भटजीसोबत पळून गेली नवरी, दीड लाखांचे दागिनेही लंपास
लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यातच नवरी भटजीसोबत पळून गेल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. थाटामाटात लग्न करुन घरात आणलेली नवरीमुलगी पळून गेल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. २३ मे रोजी जेव्हा सर्वांचं लक्ष लोकसभा निवडणूक निकालाकडे लागलं होतं तेव्हा सिरोंज शहरातील टोरी बगरोद येथील ग्रामस्थ भटजीचा शोध घेत होते. भटजी काही सापडला नाही पण ग्रामस्थांना धक्का देणारी बातमी नक्की मिळाली.
विनोद महाराज याने ७ मे रोजी त्या तरुणीचं लग्न लावून दिलं होतं. २३ मे रोजी गावात अजून एक लग्न होतं, ज्यासाठी विनोद महाराजला बोलावण्यात आलं होतं. पण लग्नाचा मुहूर्त जवळ आला तरी त्याचा काही पत्ता लागत नव्हता. यामुळे लोकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी गावातील २१ वर्षीय नवविवाहित तरुणीदेखील घरातून बेपत्ता असल्याचं लक्षात आलं.
महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली. ज्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पळून जाता महिलेने सोबत दीड लाखांचे दागिने आणि तीस हजारांची रोख रक्कमही नेली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी भटजी आणि महिलेत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळाली. त्याचं आधीच लग्न झालं असून दोन मुलंदेखील आहेत. त्याचं कुटुंबही बेपत्ता आहे. विनोद महाराज असथ गावातील एका मंदिरात पुजारी होता.