केंद्रीय मंत्रिमंडळात खातेबदल…
- स्मृती इराणींकडून काढून घेतले माहिती आणि प्रसारण मंत्रालय
- राज्यवर्धन राठोड यांच्याकडे जबाबदारी
- पियूष गोयल यांच्याकडे अर्थ खात्याचा अतिरिक्त कार्यभार
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलेल्या खातेबदलाचा झटका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना बसला. त्यांच्याकडील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. याशिवाय, ज्येष्ठ केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांची प्रकृती सुधारेपर्यंत अर्थ खात्याचा अतिरिक्त कार्यभार रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्यावर सोपवण्यात आला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणूून स्मृती यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. यापार्श्वभूमीवर, त्यांच्याकडील हे खाते काढून घेण्यात आले आहे. स्मृती यांच्याकडील महत्वाचे मंत्रालय काढूून घेण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी त्यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले होते. त्यांच्याकडे वस्त्रोद्योग खाते कायम ठेवण्यात आले आहे. राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे.
राज्य मंत्री एस.एस.अहलुवालिया यांना पिण्याचे पाणी आणि स्वच्छता मंत्रालयाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खाते सोपवण्यात आले आहे. राज्यमंत्री अल्फोन्स कन्ननथनम् यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खाते काढून घेण्यात आले. त्यांच्याकडे पर्यटन खाते कायम ठेवण्यात आले आहे.