Loksabha Election : शिवसेनेच्या या मतदार संघावर भाजपने केला दावा
उस्मानाबाद, (प्रतिनिधी) – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात युती आणि आघाडीचा उमेदवार ठरत नसल्यामुळे मतदार संघातील राजकीय वातावरण ढवळून निघाला आहे. युतीमध्ये या मतदार संघावर शिवसेनेचे प्राबल्य आहे. रविंद्र गायकवाड इथले विद्यमान खासदार आहेत. मध्यंतरी त्यांच्या वादग्रस्त वर्तणुकीमुळे या मतदार संघावर भाजपने दावा दाखविला आहे. भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी खेळी केल्याने ही जागा कोणाकडे जाणार याचा संभ्रम वाढत चालला आहे.
चालू पंचवार्शिक सोडली तर उस्मानाबाद मतदार संघावर 2014 पर्यंत राष्ट्रवादीचा पगडा कायम होता. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर अनेक आरोप झाल्यामुळे त्यांचा 2014 च्या निवडणुकीत पराभव झाला. आता शिवसेनेचे विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांना शह देण्यासाठी त्या ताकदीचा उमेदवार राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे पद्मसिंह पाटील यांच्या सून आर्चना पाटील यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली राष्ट्रवादीच्या दिसून येत आहेत. कॉंग्रेसचे अशोक चव्हाण यांना अर्चना पाटील यांची उमेदवारी अमान्य असल्याचे दिसते. त्यामुळे आघाडीचा निर्णय होत नसल्याचे चित्र असतानाच शिवसेना-भाजप युतीमध्ये देखील या मतदार संघावरून मतभेद निर्माण होत आहेत.