पाकिस्तान जैशचा प्रवक्ता असल्याप्रमाणे वागत आहे, परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानचा खोटरडेपणा उघड
पाकिस्तान जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता असल्याप्रमाणे वागत आहे अशी टीका परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानकडून करण्यात आलेले दावे आणि आश्वासनांवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं. पाकिस्तान खरंच बदलला आहे तर दहशतवाद्यांवर कारवाई करुन दाखवा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
ये नया पाकिस्तान है, ये नयी सोच है असा दावा पाकिस्तान करत आहे. तर मग त्यांनी दहशतवाद्यांविरोधात नवी कारवाई करुन दाखवावी असं रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. यावेळी रवीश कुमार यांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड करत भारताने एकच विमान गमावलं, दोन विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच एफ 16 विमानाला भारताना टार्गेट केलं, मात्र त्याबद्दल ते काहीच बोलत नसल्याचंही ते म्हणाले.
जर पाकिस्तान भारताची दोन विमानं पाडल्याचा दावा करत होतं तर मग त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसोबत ते शेअर का केला नाही असा सवाल रवीश कुमार यांनी उपस्थित केला. पाकिस्तानने एफ 16 विमानाचा वापर केला याचे साक्षीदार आणि तांत्रिक पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. हेच एफ 16 विमान विंग कमांडर अभिनंदन यांनी पाडलं. आम्ही अमेरिकेला भारताविरोधात एफ 16 चा वापर हा विक्री करताना केलेल्या नियमांना धरुन होता का याची पाहणी करण्यास सांगितलं आहे अशी माहिती रवीश कुमार यांनी दिली.
पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने घेऊन देखील पाकिस्तान नकार देत असून हे निषेधार्ह आहे. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री म्हणतात की त्यांनी जबाबदारी स्विकारलेली नाही. काहीतरी गफलत होत आहे म्हणून…पाकिस्तान जैशला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का ? असा प्रश्न रवीश कुमार यांनी यावेळी विचारला.