वंचित आघाडीला चार जागा सोडू, पण राजू शेट्टींना काॅंग्रेसने आणखी एक जागा सोडावी – अजित पवार
पुणे – समविचारी मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी वंचित बहुजन विकास आघाडीला 4 जागा द्यायला तयार आहोत. राजू शेट्टींना आम्ही एक जागा सोडणार आहोत तर त्यांना हवी असलेली दुसरी जागा काँग्रेसने सोडावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली. तसेच आघाडीचे जागावाटप येत्या 8 मार्चपर्यंत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवार आज पुण्यात आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पवार म्हणाले की, आघाडीच्या जागावाटपाला आता वेग येईल. 1 मार्च रोजी राहुल गांधी यांची मुंबई व धुळे येथे सभा असल्याने काँग्रेस नेते त्याच्या तयारीत अडकून पडले होते. पण आता पुढील आठवड्याच्या आत आघाडीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झालेले असेल. समविचारी पक्षांची मते फुटून जातीयवादी भाजप- शिवसेनेला फायदा होऊ नये यासाठी महाआघाडी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीला आम्ही चार जागा द्यायला तयार आहोत. आता त्यांनी आमच्यासोबत यायचे की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे. राजू शेट्टी यांनीही आमच्याकडे दोन जागा मागितल्या आहेत. राष्ट्रवादी त्यांना एक जागा देण्यास तयार आहे. काँग्रेसनेही शेट्टींना एक जागा अशी आम्ही विनंती केली आहे, असेही अजितदादांनी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत वंचित बहुजन विकास आघाडी आली तर भाजप- शिवसेना युतीचा आम्ही दारूण पराभव करू याची आम्हाला खात्री आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.