Breaking-newsराष्ट्रिय

२०१९ मध्ये बहुमताने जिंकू, नरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान – अमित शहा

२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपा बहुमताने विजयी होईल असा विश्वास भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील असं सांगताना उत्तर प्रदेशमध्ये ७३ ते ७४ जागा मिळतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. आजतक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. अमित शहा यांनी विरोधकांवरही टीका केली. समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आल्याने काहीच फरक पडत नाही असं सांगत आम्हाला प्रत्येक परिस्थितीत निवडणूक लढण्याचा अनुभव आहे असं अमित शहांनी म्हटलं. निवडणूक आम्हाला अत्यंत लक्ष देऊन लढावी लागणार आहे. १६ राज्य सरकार आणि ११ कोटी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढणार आहेत अशी माहिती अमित शहा यांनी दिली.

आज लोकांना दिल्लीत बसलेला पंतप्रधान आपला विचार करत असल्याचा खात्री आहे. आमच्यामुळे २२ कोटी लोकांच्या आयुष्यात बदल झाला. अडीच कोटी लोकांच्या घरापर्यंत वीज पोहोचवली असं अमित शहा यांनी सांगितलं. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका करताना ज्यांनी आणीबाणी आणली त्यांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही असं म्हणत काँग्रेसवर टीका केली. प्रियंका गांधींच्या राजकारण प्रवेशावर बोलताना प्रियंका गांधी गेल्या १२ वर्षांपासून राजकारणात असल्याचं ते म्हणाले

कोणतीही संस्था देशापेक्षा मोठी असू शकत नाही असं सांगत अमित शहा यांनी केंद्र सरकारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सल्ला देण्याचा अधिकार आहे असं म्हटलं आहे. त्यांना केंद्र सरकार आरबीआय आणि सीबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप करत आहेत असं विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी कोणत्याही संस्थेत भाजपाने मध्यस्थी केलेली नाही असं सांगितलं.

‘कोणत्याही संस्थेत भाजपाने मध्यस्थी केलेली नाही. कोणतीही संस्था देशापेक्षा मोठी असू शकत नाही. देश सर्वोच्च आहे. मात्र केंद्र सरकारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सल्ला देण्याचा अधिकार आहे. संसदेत उत्तर सरकारला द्यायचं असतं’, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

यावेळी अमित शहा यांनी दहशतवादी हल्ल्याची तारीख आम्ही ठरवत नाही असं सागत जेव्हा हल्ला होईल तेव्हा उत्तर देण्यात येईल असा पाकिस्तानला इशारा दिला. आम्ही दहशतवादाविरोधात अत्यंत कठोरतेने लढा दिला आहे. आतापर्यंतच्या सर्व सरकारांशी तुलना करता आमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे असं अमित शहा यांनी सांगितलं.

२६/११ नंतर काँग्रेस सरकारने काय केलं ? असा प्रश्न यावेळी अमित शहा यांनी विचारला. काँग्रेसनेही १० वर्ष पाकिस्तानशी चर्चा केली असं सांगत पाकिस्तान चर्चैसाठी तयार होत नाही असं अमित शहा यांनी सांगितलं. काश्मीरसंबंधी प्रश्न विचारलं असता शस्त्र वापरणं हा अंतिम पर्याय नाही पण समोरुन शस्त्रं उचलली जात असतील तर आपण न उलचणंही चुकीचं असल्याचं ते म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button