रामदेव बाबांना झटका, पाच वर्षात पहिल्यांदाच पतंजली तोट्यात
योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समूहाला गत पाच वर्षात पहिल्यांदाच नुकसान झालं आहे. २०१३ पासून आतापर्यंत नफ्यात असणाऱ्या पंतजलीचे या वर्षात विक्रीत घसरण झाल्यामुळे नफ्यातही फटका बसला आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या स्पर्धेत उतरल्याने आणि जीएसटीचा फटका पतंजलीला बसला आहे.
नैसर्गिक आणि वनौषधी उत्पादन क्षेत्रात बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्या उतरल्यामुळे मार्च २०१८ ला संपलेल्या वित्त वर्षात पतंजली आयुर्वेद कंपनीची विक्री आणि नफा यात मोठी घट झाली आहे. जीएसटीमुळे वितरण व्यवस्थेत समस्या निर्माण झाल्याचा फटकाही पतंजलीला बसला आहे. केअर रेटिंग्ज या संस्थेच्या अहवालानुसार, पतंजलीने जीएसटीचा वेळेत स्वीकार केला नाही, तसेच त्यासाठीच्या योग्य त्या पायाभूत सोयी आणि वितरण साखळी निर्माण केली नाही. याचा मोठा फटका बसून कंपनीची उलाढाल घटली आहे.
संशोधन संस्था ‘टॉफलर’ने २०१७-१८ वित्त वर्षात पतंजली समूहाचा महसूल १० टक्क्यांनी घटून ८,१३५ कोटी रुपयांवर आला. २०१६-१७ मध्ये तो ९,०३० कोटी रुपये होता. कंपनीचा नफाही अर्ध्यापेक्षा जास्त कमी होऊन ५२९ कोटी रुपयांवर आला. आदल्या वर्षी तो १,१९० कोटी रुपये होता. २०१३ पासून कंपनीच्या विक्री व नफ्यात सातत्याने वाढ होत होती. वित्त वर्ष २०१७ पर्यंत कंपनीचा नफा दरवर्षी जवळपास दुपटीने वाढला. मात्र, या वर्षी कंपनीला तोट्याला सामोरं जावं लागले आहे.