महिला टी-२० वर्ल्डकपचा थरार उद्यापासून! जाणून घ्या टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल

Womens T20 World Cup | हरमनप्रीत कौरच्या ऐतिहासिक नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२५ चे जेतेपद पटकावून इतिहास रचला होता. भारतात झालेल्या त्या स्पर्धेत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला आणि फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवून पहिल्यांदाच वनडे विश्वकरंडकावर आपले नाव कोरले. आता भारतीय महिला संघाला सलग दुसरा वर्ल्डकप जिंकून विश्वविजेतेपदाचा ‘डबल धमाका’ करण्याची सुवर्णसंधी आहे. आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.
इंग्लंडमध्ये रंगणार टी-२० चा महासंग्राम
आगामी आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचे यजमानपद यंदा इंग्लंडकडे आहे. त्यामुळे साहजिकच भारतीय क्रिकेट चाहत्यांना हे सामने भारतात किती वाजता थेट पाहायला मिळणार, असा प्रश्न पडला आहे. भारत आणि इंग्लंडच्या वेळेत ४ तास ३० मिनिटांचा फरक आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना उद्या, १२ जून रोजी यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता सुरू होईल.
एकाच दिवशी रंगणार ३ सामने; असे असेल वेळेचे गणित
आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत एकाच दिवशी ३ सामने खेळवले जाणार आहेत. शनिवारी होणारा पहिला सामना स्कॉटलंड आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी ३ वाजता सुरु होईल. तर याच दिवशी होणारा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. तर दिवसातील तिसरा सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता सुरु होईल.
हेही वाचा
पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचा भडका! अमेरिकेचा इराणवर जोरदार हल्ला; ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद
पाहा संपूर्ण वेळापत्रक
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या स्पर्धेत भारतीय संघाचे सर्व सामने ‘प्राईम टाईम’ला म्हणजेच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहेत. भारताची पहिलीच लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.
भारताच्या सामन्यांचे संपूर्ण शेड्युल:
- १४ जून: भारत विरुद्ध पाकिस्तान (संध्याकाळी ७:०० वा.)
- १७ जून: भारत विरुद्ध नेदरलँड्स (संध्याकाळी ७:०० वा.)
- २१ जून: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (संध्याकाळी ७:०० वा.)
- २५ जून: भारत विरुद्ध बांगलादेश (संध्याकाळी ७:०० वा.)
- साखळी फेरीतील शेवटचा सामना: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (संध्याकाळी ७:०० वा.)
वनडे वर्ल्डकपनंतर आता टी-२० वर्ल्डकपमध्येही आपली बादशाहत सिद्ध करण्यासाठी हरमनप्रीत ब्रिगेड पूर्णपणे सज्ज झाली असून, पहिल्याच सामन्यापासून भारतीय संघ विजयाची घोडदौड राखण्यासाठी मैदानात उतरेल.





