“आर्थिक वादळ येणार”; इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

Rahul Gandhi | देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसऱ्यांदा झालेल्या वाढीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “देशात एक मोठे आर्थिक वादळ येणार असून, ही अदानी-अंबानी रचना जास्त काळ टिकणार नाही,” असा सूचक इशारा त्यांनी दिला. रायबरेली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ९० पैशांनी वाढ केली. गेल्या पाच दिवसांतील ही दुसरी दरवाढ ठरली आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले, “देशाच्या अर्थव्यवस्थेवर सध्या अत्यंत कठीण काळ येत आहे. यावर ठोस उपाययोजना किंवा कार्यवाही करण्याऐवजी पंतप्रधान मोदी लोकांना परदेश दौरे न करण्याचा सल्ला देत आहेत, मात्र ते स्वतः मात्र परदेश दौऱ्यांवर जात आहेत.”
हेही वाचा
सोसायटीवरील ‘ॲमिनेटीज्’ कर आकारणी रद्द करा!
…पण फटका सामान्य माणसाला बसणार!
पंतप्रधानांच्या धोरणांवर टीका करताना ते पुढे म्हणाले, “मी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हेच सांगतोय की मोदींनी देशाची आर्थिक रचना बदलली आहे. एक मोठे आर्थिक वादळ घोंगावत आहे. त्यांची ही अदानी आणि अंबानी यांच्या फायद्याची रचना जास्त काळ टिकणार नाही, ती लवकरच कोसळेल. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, ही रचना कोसळल्यानंतर त्याचा थेट फटका सर्वसामान्य माणसाला बसणार आहे. या आर्थिक धक्क्याचा परिणाम केवळ अदानी, अंबानी आणि मोदींवर होणार नाही, तर देशातील सामान्य जनतेवर याचा खोल आणि अभूतपूर्व परिणाम होईल. कठीण काळ समोर येत आहे.”
इंधन दर चार वर्षांतील सर्वोच्च पातळीवर
मंगळवारच्या दरवाढीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९८.६४ रुपयांपर्यंत, तर डिझेलचे दर प्रति लिटर ९१.५८ रुपयांवर पोहोचले आहेत. वेगवेगळ्या राज्यांमधील मूल्यावर्धित करातील (व्हॅट) फरकामुळे देशातील विविध भागांत हे दर कमी-अधिक असू शकतात. मात्र, या दरवाढीमुळे देशातील इंधनाचे दर आता मे २०२२ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत, ज्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





