होर्मुझ ओलांडण्यासाठी भारतीय जहाजांना टोल? इराणचे अधिकृत स्पष्टीकरण

नवी दिल्ली | अमेरिकेने २८ फेब्रुवारी रोजी इराणविरुद्ध लादलेल्या युद्धानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर निर्बंध आणल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भारताच्या विनंतीनंतर अनेक भारतीय तेलवाहू जहाजांना भारताच्या दिशेने रवाना करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, या जहाजांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी भारताला कर भरावा लागला, अशी चर्चा सातत्याने होत होती. या सर्व वृत्तांचे आता इराणने स्पष्टपणे खंडन केले आहे.
भारतामधील इराणचे राजदूत फथअली यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “आम्ही कोणत्याही प्रकारचा कर लादलेला नाही. भारताने पैसे दिले आहेत की नाही, हे तुम्ही भारत सरकारला विचारू शकता.”
ते पुढे म्हणाले की, “आमचे भारत सरकारशी चांगले संबंध आहेत. आम्हाला भारताला मदत करायची आहे आणि त्यांनीही या कठीण काळात आमच्याशी असलेल्या संबंधांमुळे आम्हाला मदत केली आहे. आमचा ‘नौकानयन स्वातंत्र्यावर’ (Freedom of Navigation) विश्वास असून आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्यांशी बांधील आहोत. मात्र, होर्मुझची सामुद्रधुनी हे इराण आणि ओमानचे प्रादेशिक जलक्षेत्र आहे.”
हेही वाचा : होर्मुझची नाकेबंदी होताच भारताला सर्वात मोठी खुशखबर; थेट तेहरानमधून… तेलाचं टेन्शनच मिटलं!
राजदूत फथअली यांनी भारत आणि इराण यांच्यातील संबंध भविष्यातही मजबूत राहतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी दोनदा संवाद साधल्याची आठवण करून देत दोन्ही देशांचे हितसंबंध समान असल्याचे नमूद केले.
दरम्यान, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा पूर्णपणे सुरू करण्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, इराण नौकानयन स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करतो.
याच वेळी, इराणच्या राजदूतांनी संकेत दिले की, अमेरिकेने “बेकायदेशीर मागण्या” करणे थांबवल्यास इराण अमेरिकेसोबत चर्चेच्या आणखी एका फेरीसाठी तयार आहे. इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात झालेली चर्चा कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपल्यानंतर त्यांनी हे विधान केले. अमेरिकन बाजूने ठेवलेल्या अस्वीकार्य अटींमुळे ही बोलणी यशस्वी होऊ शकली नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. “जर त्यांनी आमच्या अटी मान्य केल्या, तर चर्चा शक्य आहे,” असे सांगत त्यांनी भविष्यातील चर्चेसाठी दरवाजे खुले ठेवले.





