मुंबईत ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा
उद्धव ठाकरेंचे ८ खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

मुंबई : राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांवरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे ८ खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सविस्तर भाष्य केलं असून ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
अरविंद सावंत काय म्हणाले?
बाळासाहेब ठाकरे यांचे गद्दारांबाबत काय विचार होते? सांगा ना. आता मला खासदार ओमराजे निंबाळकर यांचा फोन आला. आणखी काही सहकार्यांचे फोन आले. ओमराजे निंबाळकर तर संतापले होते. कारण खोट्या बातम्या समोर येत आहेत. आता त्याबाबत मी कायदेशीर कारवाई करणार आहे. आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हा प्रयत्न आहे. पण आम्ही आयुष्यभर निष्ठावंत राहणार आहोत. आम्ही भगवा घेऊन आलो आहोत आणि जाताना तो भगवा पांघरूण जाऊ”, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
“सध्या प्रत्येक खासदार ज्यांच्या-त्यांच्या कामात आहेत. मात्र, जर कोणी अशा बैठकीला गेलं असेल तर त्यांचे फोटो प्रसिद्ध करा. हे सर्व आता का सुरू आहे, याचं कारण आता २४ तारखेला आमच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जात आहेत. या माध्यमातून असं दाखवण्याचा प्रयत्न आहे की, हे पाहा तिकडे काहीच शिल्लक नाही. सर्वकाही आम्हीच आहोत असं दाखवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे”, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीची चमक फिकी ; चांदीच्या दरात ‘एवढ्या’ रुपयांची घसरण, वाचा आजचा भाव काय ?
“विकली जाणारी आणि विकत घेणारी माणसं कोण आहेत हे ओळखा. महाराष्ट्रात विकत कोण कोणाला घेत आहे? पन्नास खोके एकदम ओके असं कोण कोणाला म्हणालं होतं? कोणी दिले होते? कबुल केलं ना एका जाहीर सभेत. हिंगोलीच्या आमदारांनी त्याबाबत सर्व काही कबूल केलं. मात्र, आमची विकली जाणारी औलाद नाही. आम्ही जगू ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आणि याच शिवसेनेबरोबर मरू”, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
‘लिहून देतो, ठाकरेंची साथ सोडणार नाही’
अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना एक पत्र लिहिलं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, “मी जाहीरपणे लिहून देतो की मी शिवसेना (उद्धवबाळासाहेब ठाकरे) यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. मला उभं चिरलं तरी शिनसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष ‘मातोश्री’शी असलेलं नातं कधीही तोडणार नाही. खरं तर मूळ शिवसेना पक्ष यांच्यासोबत प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दूधाशी प्रतारणा करण्यासमान आहे, असं मी समजतो”, असं अरविंद सावंत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
ठाकरेंच्या खासदारांबरोबर बैठक झाली का? एकनाथ शिंदेंचा खुलासा
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदारांची एकनाथ शिंदेंबरोबर बैठक झाल्याच्या चर्चांवर आता शिवसेना (शिंदे) पक्षाकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत खुलासा करण्यात आला आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचं सांगितलं आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारं आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु त्यात कोणतंही तथ्य नाही, या केवळ अफवा आहेत. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणं माध्यमांनी टाळलं पाहिजे”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.





