काम नाही तर पद नाही; एकनाथ शिंदे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा

मुंबई: राज्यातील निवडणुका संपल्या आहेत. जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करा. मतदार याद्यांचे बारकाईने पुर्नवलोकन करा, केंद्र प्रमुखांच्या नियुक्त्या करा, पदाधिकाऱ्यांचे काम दिसले नाही तर पद राहणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षाचे मुख्य नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
काही दिवसापूर्वी शिवसेना शिंदे पक्षाने संपर्कप्रमुख, विभागीय संपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांच्या नेमणूका केल्या. या सर्व पदाधिकाऱ्यांची एक ऑनलाईन बैठक शिंदे यांनी घेतली. पद विसरुन लोकांसाठी काम करा. मतदार संघांच्या पुर्नरचनेनंतर स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा मतदार संघ वाढणार आहेत. त्यासाठी शिंदे यांनी काही मार्गदर्शक तत्व सांगितली. लोकसभा संपर्कप्रमुखांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घेऊन त्या बैठकीचे फोटो आणि तपशील दररोज पाठविण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.
निवडणूक आयोगाकडून राज्यात राबवल्या जाणाऱ्या ‘एसआयआर’ मोहीमेसाठी आतापर्यंत कोणी किती मतदान केंद्र प्रमुख नेमले, कितीवेळा मतदार संघाचा दौरा केला, किती बैठका घेतल्या, याचा तपशील सादर करा. पक्षाची संघटन रचना अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याच्या सूचना यावेळी शिंदे यांनी दिल्या.





