कुलदीप यादव मालिका अर्ध्यावर सोडणार?
बीसीसीआयकडे लग्नासाठी सुट्टी मागितली
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ सध्या भारतीय दौऱ्यावर असून कसोटी मालिका सध्या खेळत आहेत. यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका आणि पाच सामन्यांची टी२० मालिकाही दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध खेळणार आहे. दरम्यान, हा दौरा सुरू असतानाच असे समजत आहे की कुलदीप यादवने बीसीसीआयकडे सुट्टीची मागणी केली आहे.
सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत कुलदीप भारतीय संघाचा भाग असून त्याला कोलकातामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीही देण्यात आली आहे. त्यामुळे तो शुक्रवारपासून (१४ नोव्हेंबर) सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत खेळताना दिसत आहे. मात्र या सामन्यापूर्वी त्याने बीसीसीआयकडे त्याच्या लग्नासाठी सुट्टी मागितल्याचे समजत आहे.
कुलदीपच्या लग्नाचे कार्यक्रम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहेत, त्यामुळे त्याने त्यावेळी बीसीसीआयकडे सुट्टी मागितली आहे. त्यामुळे जर बीसीसीआयने त्याची सुट्टी मान्य केली, तर तो कदाचित दुसऱ्या कसोटीपूर्वी किंवा त्यानंतर घरी लग्नासाठी जाऊ शकतो.
कुलदीपचे लग्न यापूर्वी आयपीएल २०२५ नंतर होणार होते, पण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेल्या भारत-पाकिस्तानमधील युद्धजनक परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ हंगाम पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळी कुलदीपला त्याचे लग्न रद्द करावे लागले होते.
हेही वाचा : ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची 15 एकर शासकीय जमीन बिनबोभाट लाटली!
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात २२ नोव्हेंबरपासून दुसरा कसोटी सामना दिल्लीमध्ये खेळवला जाणार आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबरपासून वनडे मालिका आणि त्यानंतर टी२० मालिका होईल.
कुलदीप भारताच्या तिन्ही क्रिकेट प्रकारातील संघाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, जर त्याला बीसीसीआयने सुट्टी मंजूर केली, तर कदाचित तो वनडे आणि टी२० मालिकेसाठी तरी अनुपलब्ध असू शकतो.
दरम्यान, सुत्रांनी सांगितले आहे की भारतीय संघव्यवस्पापन त्याची किती आणि कधी भारतीय संघाला सर्वाधिक गरज आहे, याचा आढाव घेईल आणि मग त्यानुसार त्याला सुट्टी मंजूर केली जाऊ शकते. कुलदीप यादवला यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी२० मालिकेदरम्यान, पहिल्या तीन सामन्यानंतर भारतीय संघातून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी मुक्त करण्यात आले होते.
त्यामुळे तो भारतीय अ संघाकडून बंगळुरूमध्ये दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध प्रथम श्रेणी सामना खेळला होता. त्यामुळे कदाचित कुलदीप दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर घरी परतू शकतो.





