सीना नदीच्या महापुरात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
शिवणीतील शेतकऱ्यांनी गमावली अर्ध्या आयुष्याची पुंजी
सोलापूर : सीना नदीच्या महापुरामुळे काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कित्येक कुटुंबाचा संसारच या पुरात वाहून गेला. शिवणी येथील राजकुमार गुंड तर पाकणी येथील कमलाकर आवताडे या दोन्ही कुटुंबाचा अवघा संसारच पुरात वाहून गेल्याचे चित्र आहे. सीना नदीच्या पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांची काय दयनीय अवस्था झाली याची ही दोन उदाहरणे.
गेल्या आठवडाभरापासून सीनापात्रात पुराचे थैमान सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर प्रशासनाने याबाबत धोक्याची सूचना दिली होती. मात्र यापूर्वी कधीच सीना नदीला एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी न आल्याने या पुराची भीषणता काठावरील शेतकऱ्यांच्या लक्षात आली नाही. मात्र ऐनवेळी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही राहिले नाही.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
यापूर्वी सीना नदीत एवढे पाणी आलेच नव्हते. २०२० च्या पुरात घराच्या जोत्याला पाणी होते. यामुळे घरातील साहित्य उंच ठिकाणी ठेवून आम्ही जनावरे हिरज रस्त्याकडे आणली. मात्र या गडबडीत कोंबड्या घेऊन जाता आल्या नाहीत. पुराच्या पाण्याने जवळपास ६० ते ७० कोंबड्या वाहून गेल्या. बुधवारी पाणी इतके वाढले की घराच्या छतावरून पाणी वाहू लागले. घरात असणारे गहू ज्वारी यासह जवळपास १५ क्विंटल मका या पाण्यात भिजून गेली. त्याचबरोबर पुराच्या पाण्यामुळे घरातील टीव्ही ,फ्रिज, मिक्सर यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह लाकडी पलंग, सोपा पूर्णपणे निकामी झाला. अंगणात ठेवलेली गॅस टाकी सुद्धा वाहून गेली. सारं काही वाहून गेला आहे आता परत उभे करण्यात उर्वरित आयुष्य जाईल.
नदीला लगतच शेती आहे. शेतातच घर. यापूर्वी कधीच नदीला एवढे पाणी आले नाही यामुळे आमचा अंदाज चुकला. फक्त दैनंदिन गरजेच्या वस्तू व जनावरे घेऊन आम्ही बाहेर पडलो. मात्र यावेळेस पुराचे पाणी इतके आले की घरच बुडून गेले. पुराच्या पाण्यामुळे घरातली पांडे वगळता सर्वकाही भिजवून गेले. जनावराच्या खाद्यासाठी घरात ठेवलेली जवळपास २५ ते ३० क्विंटल मका, आम्हाला वर्षभर खाण्यासाठी लागणारी ज्वारी, गहू सारं काही पाण्यात बुडाले.
सारं धान्य सडून गेले. घरातील संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या. गायींसाठी तयार केलेला सात पिशव्या मुरघास वाहून गेला. आता घरी माघारी आलो आहे, आम्हाला खाण्यासाठी सामाजिक संस्था व इतरांकडून मदत मिळत आहे पण जनावरांना खायला काय घालू हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.





