“धर्म आमच्यात कधीच येणार नाही”; झहीरसोबतच्या आंतरधर्मीय लग्नावर सोनाक्षी सिन्हाची स्पष्टवक्ती कबुली

Sonakshi Sinha | बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांनी २०२४ मध्ये आठ वर्षांच्या नात्यानंतर आंतरधर्मीय विवाह केला. वेगळ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न केल्यामुळे सोनाक्षीवर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगही करण्यात आले. मात्र या सर्व टीकांवर सोनाक्षीने आता मौन सोडत, आपल्या नात्याविषयी उघडपणे मत व्यक्त केले आहे.
‘द राईट अँगल विथ सोनल कालरा’ या मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली, आम्ही एक कपल आहोत, आम्ही घरी कसे राहतो, आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कसे वाढलो, त्यानुसार काही प्रथा आहेत, ज्याचे तो आणि त्याचे कुटुंब पालन करतात; ज्यांचा मी खरोखर आदर करते.
मी आणि माझे कुटुंब काही रीतीरिवाज पाळतो, ज्यांचा ते आदर करतात. धर्म ही अशी गोष्ट आहे जी आमच्यात कधीही येणार नाही. त्याबद्दल कधीही कोणताही प्रश्न, भांडण किंवा तणाव निर्माण झाला नाही आणि मला वाटते की तीच सर्वात सुंदर गोष्ट आहे, असं सोनाक्षी म्हणाली.
हेही वाचा : मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेच्या निकषात बदल करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोनाक्षीचे आई-वडील शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्याशी असलेल्या झहीरच्या संबंधांबद्दल बोलताना सोनाक्षी सिन्हा म्हणाली, जेव्हा जेव्हा तो येतो तेव्हा सगळे जण ‘झहीर येतोय, जावई येतोय’ असे म्हणत धावतात. माझी आई सतत विचारत असते की तो काय खाणार आहे आणि माझ्या वडिलांना त्याच्याबरोबर वेळ घालवणे आवडते. मला वाटते की ते खूप चांगले मित्र झाले आहेत. मी खोलीत प्रवेश केल्यावर ते सहसा गप्पा मारत असतात आणि मी शांत बसते.
आपण म्हणतो की आपल्याला अशी एखादी व्यक्ती शोधायची आहे, ज्याच्याबरोबर आपल्याला म्हातारे व्हायचे आहे. पण, झहीरसारख्या व्यक्तीबरोबर राहिल्यानंतर तुम्हाला जाणवते की तुम्हाला अशा व्यक्तीची गरज आहे, ज्याच्यासमोर तुम्ही लहान मुलासारखे वागू शकाल. त्यामुळेच मजा चालू राहते. तुम्ही सतत हसत राहता. माझ्या आयुष्यात मला ती गोष्ट कमी पडत होती. आता ती आली आहे, त्यामुळे मी यापेक्षा जास्त आनंदी होऊ शकत नाही, असंही सोनाक्षी म्हणाली.





