जरांगे पाटील यांचा दावा : “आम्ही ओबीसीत गेलो नाही, ओबीसी आमच्यात आलाय”
मनोज जरांगे पाटील यांचा आतापर्यंतचा अत्यंत मोठा दावा
मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईतील उपोषणानंतर सरकारने मराठा समाजासाठी जीआर काढला असला तरी, ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ मैदानात उतरले असून, उपसमितीची स्थापना देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा दावा करत म्हटले, “आम्ही ओबीसीत गेलो नाही, तर ओबीसी आमच्यात आलाय. आमचा हक्क मिळालेला आहे आणि तो संविधानिक पद्धतीने मंजूर झाला आहे.”
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, मराठा समाज 1881 पासून आरक्षणात आहे आणि हा निर्णय समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक होता. त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करत, “जीआरचा चांगला अभ्यास भुजबळ यांना आहे, त्यांनी मोठ्या पक्षांमध्ये सत्ता हाताळली आहे,” असेही म्हटले.
सरकारच्या निर्णयानंतर ओबीसी नेते व समाज आक्रमक होत असून, आगामी काळात या वादाला अधिक उधाण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





