कालच्या राड्यानंतर विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय, अधिवेशन सुरू असताना केवळ ‘यांना’च प्रवेश

मुंबई : विधानभवनातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिवेशन काळात कडक शिस्तीचे आदेश जारी केले आहेत. अधिवेशन सुरू असताना आता केवळ आमदार, त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक आणि शासकीय अधिकारी यांनाच विधानभवनात प्रवेश दिला जाणार आहे. मंत्री, आमदारांचे खाजगी कर्मचारी तसेच कार्यकर्त्यांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
कालच्या गोंधळ आणि हाणामारीनंतर अध्यक्षांनी हा निर्णय घेतला असून, सभागृहांमध्ये मंत्र्यांना बैठका घेण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. अशा बैठकांसाठी मंत्र्यांनी आपल्या मंत्रालयातील दालनांचा वापर करावा, अशी स्पष्ट सूचना अध्यक्षांनी दिली आहे. अत्यंत आवश्यक प्रसंगीच बैठकांसाठी व अभ्यागतांच्या प्रवेशासाठी अध्यक्ष आणि सभापती यांच्या मान्यतेची अट घालण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘राज्यातील काही नेते अन् प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात’; अंबादास दानवे
विधानभवनातील शिस्त कायम राहावी आणि अभ्यागतांच्या वर्तणुकीवर नियंत्रण रहावे, यासाठी आमदारांच्या सोबत येणाऱ्या व्यक्तींच्या वर्तणुकीची जबाबदारी संबंधित आमदारांवर निश्चित करण्यात येणार असल्याचेही अध्यक्षांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आमदारांच्या नैतिक वर्तनासाठी लोकसभेच्या धर्तीवर ‘नीती मूल्य समिती’ गठीत करण्याचा विचार असून, त्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येईल, असेही अध्यक्षांनी सांगितले. विधान परिषदेचे सभापती आणि गटनेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, काल सायंकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.





