‘आज तुम्ही पंतप्रधानांना शिव्या देऊ शकता’, आणीबाणीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विधान

Devendra Fadnavis : “आणीबाणीच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान संपविण्यात आले होते. सर्वच विरोधी पक्ष त्यावेळी आणीबाणीच्या विरोधात रस्त्यावर उतरले. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. ज्यांचे लग्न झाले नव्हते, त्यांचेही कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यात आले. अनेक घरांची तोडफोड करण्यात आली. अनुशासनाच्या नावाखाली अशरक्षः उन्माद त्या काळात देशाने पाहिला. या सर्वांची बातमी होऊ नये म्हणून वृत्तपत्रावर निर्बंध आणले गेले”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीच्या विरोधात बोलताना दिली.
संविधान हत्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अलीकडे कुणीही उठते आणि लोकशाहीची गळचेपी, लोकशाहीची हत्या होत आहे, असे सांगते. पण त्यांनी आणीबाणीच्या कालखंडाकडे बघितले पाहिजे. मग त्यांच्या लक्षात येईल की, आज भारतामध्ये कुठल्याही चौकात उभे राहून देशाच्या पंतप्रधानांना शिव्या देऊ शकता. तरी तुमच्यावर कुणीही कारवाई करत नाही. भारताची लोकशाही आज जिवंत आहे. कारण त्याकाळी लोकतंत्र सेनानींनी संघर्ष करून लोकशाही टिकवली.”
हेही वाचा – Mission PCMC : महामंडळावर संधी कुणाला?…माजी आमदार विलास लांडे की माजी महापौर योगेश बहल?
देशात लागू केलेल्या आणीबाणीच्या निर्णयाला ५० वर्ष झाल्यानिमित्त आणीबाणीत संघर्ष करणाऱ्यांच्या स्मरणार्थ मुंबई येथे संविधान हत्या दिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आणीबाणीमध्ये झालेल्या गळचेपीची माहिती देतान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री जॉर्ज फर्नांडिज यांचे उदाहरण दिले. फर्नांडिज भूमीगत झाल्यामुळे त्यांचा भाऊ आणि आईचा खूप छळ करण्यात आला. ज्यामुळे त्यांच्या भावाला जबर मानसिक धक्का बसला, त्यातून ते बाहेर येऊ शकले नाहीत, अशी आठवण फडणवीस यांनी सांगितली. तसेच तुरूंगात टाकलेल्या अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली. त्यामुळेच आम्ही लोकतंत्र सेनानींचा सन्मान करण्यासाठी २०१७ साली मानधन देण्याचा निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.





