चीनचा भारतावर ‘वॉटर बॉम्ब’ !
भारताच्या ईशान्येकडील राज्ये म्हणे, दुष्काळाने तडफडायला लावणार !
बीजिंग / नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षांचे परिणाम म्हणून भारताने सिंधू नदीचे पाणी अडवण्याचा निर्णय घेतला. पण, पाकिस्तानचा पुळका असणाऱ्या चीनने मात्र याचा निषेध केला असून भारताच्या ईशान्य भागात वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधून या राज्यांमधील नागरिक दुष्काळाने कसे तडफडतील, हे पाहणे चीनच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारताचे नाक दाबले की तोंड उघडेल, अशी वक्तव्ये चीनच्या प्रमुख नेत्यांनी केली आहेत.
काय आहे चीनचा प्लॅन ?
भारतातून पाकिस्तानात वाहणाऱ्या सहा नद्या आहेत, त्यातील सिंधू नदीचे पाणी अडवून पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय भारताने घेतला. त्याचप्रमाणे, भारताच्या ईशान्येकडे वाहणारी ब्रह्मपुत्रा ही मुख्य नदी चीन मधून भारतात येते आणि आपल्या ईशान्येतील काही राज्यांमधून तिचा प्रवास होतो. ब्रह्मपुत्रेवर जगातील सर्वात मोठे धरण बांधून तिचे पाणी अडवले तर भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये दुष्काळ पडेल, असे स्वप्न चीन पाहत आहे. चीनला पाकड्यांचा पुळका असल्यामुळे भारताचा बदला ते अशा प्रकारे घेणार आहेत.
यामुळे नेमके काय होईल ?
चीनने हे पाऊल उचलले, तर त्यामुळे नेमके काय होईल याची तपासणी करण्यासाठी आणि वस्तुस्थिती पाहण्यासाठी भारताचे उच्चस्तरीय अधिकारी बैठकांमागून बैठका घेत आहेत. या धरणामुळे पूर्ण ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रावर चीनचा ताबा राहू शकतो आणि भारतासाठी हा ‘वॉटर बॉम्ब’ आहे असे चीनला वाटते. ज्याप्रमाणे, पाणी अडवून भारताच्या काही राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आणण्याचा चीनचा डाव आहे, त्याचप्रमाणे, अचानक पाणी सोडून या राज्यांमध्ये पूरजन्य परिस्थितीही ते आणू शकतात, हे देखील त्यांचे कारस्थान असावे.
वीजनिर्मितीवर देखील परिणाम..
असे झाले तर, ईशान्येकडील राज्यांमध्ये जी वीजनिर्मिती होते, त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो, शिवाय जलसिंचन, पाटबंधारे यांनाही फटका बसू शकतो.
भारताचे पाऊल आता महत्त्वाचे..
चीनच्या या भारतविरोधी हालचाली नंतर भारताच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे, चीनला अशा पद्धतीने नदी अडवण्याचा अधिकार नाही, असे त्यांना ठणकावून सांगण्यात आले आहे.
चीनचा नेमका वाटा किती ?
ब्रह्मपुत्रा नदीच्या एकूण पाण्याच्या विसर्गात चीनचा वाटा फक्त २२ ते ३० टक्के आहे, हे भारताच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सिद्ध झाले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी चीनवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, ही नदी भारतातही वाहते, मध्ये थांबत नाही. चीनने मनात आणले तरी ते असे करू शकत नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा : Mission PCMC : महापालिका निवडणुकीत खरी लढत भाजपा अन् राष्ट्रवादीतच!
पाकिस्तानची आडमुठी भूमिका..
दरम्यान, पाकचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचे वरिष्ठ सहायक राणा इहसान अफझल यांनी पाकबरोबरचा सिंधू जल करार रद्द करण्यात आल्यानंतर चीन ब्रह्मपुत्रेच्या पाण्याचा भारतात जाणारा प्रवाह रोखू शकतो, असे वादग्रस्त विधान केले होते. जर भारताने असे काही केले आणि पाकला जाणारा प्रवाह थांबवला, तर चीनही तसेच करू शकतो. पण जर अशा गोष्टी घडल्या, तर संपूर्ण जगावर युद्धाचे संकट ओढवेल, असे अफझल यांनी म्हटले आहे.
चीनला शक्य आहे का ?
तांत्रिक, भौगोलिक व भू-राजकीय घटकांचा विचार केल्यास चीन ब्रह्मपुत्रेचा प्रवाह काही प्रमाणात बदलू शकतो. मात्र, पूर्णपणे थांबवू शकत नाही. चीनमध्ये वाहणाऱ्या नदीचा स्रोत प्रामुख्याने हिमनदी वितळणे आणि तिबेटवरील मर्यादित पाऊस यांच्याशी निगडीत आहे. भूतानचा आकार लहान असूनही ते नदीच्या खोऱ्यात २१ टक्के इतके योगदान देतात, हे पण लक्षात घ्यायला हवे.
भारतात किती टक्के पाणी..
ब्रह्मपुत्रा नदीत एकूण विसर्गाच्या ३४.२ टक्के भाग व्यापणाऱ्या भारतीय खोऱ्यातून सर्वाधिक म्हणजेच ३९ टक्के पाणी येते. भारतात प्रवेश करण्यापूर्वी संपूर्ण ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहापैकी फक्त १४ टक्के पाणी नदीचे असते आणि उर्वरित ८६ टक्के पाणी भारतातील पावसाळ्यामुळे मिळालेले असते. त्यामुळे, ब्रह्मपुत्रेच्या नदी प्रवाहात चीनचे योगदान अगदी किरकोळ आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांची माहिती..
आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी त्यांच्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये नमूद केले आहे की, चीन ब्रह्मपुत्रेच्या एकूण प्रवाहापैकी फक्त ३० ते ४० टक्के वाटा देतो, ज्याचा स्रोत मुख्यत्वे हिमनदी वितळणे आणि तिबेटवरील मर्यादित पाऊस आहे. ते म्हणाले की, नदीचे उर्वरित ६५ ते ७० टक्के पाणी भारतात वाहणाऱ्या नदी आणि पावसातून मिळते. नदीचे उर्वरित ६५-७० टक्के पाणी भारतात निर्माण होते. हे पाणी नदीला अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड व मेघालयातील मुसळधार पाऊस, तसेच प्रमुख उपनद्यांमुळे मिळते, असे त्यांनी म्हटले आहे.
भारताने चिंता करण्यासारखे कारण नाही..!
चीनने ब्रह्मपुत्रेवर जगातील सर्वांत मोठ्या जलविद्युत धरणाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. या नदीच्या प्रवाहाचा काही भाग बोगद्यांमधून वळवून जलविद्युत निर्मिती करणे, या प्रकल्पात समाविष्ट आहे. चीनने पाण्याचा प्रवाह बदलणे भारतासाठी चिंतेची बाब असली, तरी ही चिंता हंगामी आहे. म्हणजेच पाऊस नसलेल्या महिन्यांत याचा विपरीत परिणाम जाणवू शकतो. मुख्य म्हणजे हा प्रकल्प चीनसाठीदेखील आव्हाने निर्माण करणारा आहे, असे जागतिक तज्ज्ञांना वाटते. तिबेट पठार भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय आहे. मोठे धरण प्रकल्प धोकादायक ठरू शकतात आणि त्यामुळे मोठे भूकंप होण्याची शक्यता आणखी वाढते. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे विनाशकारी पूर येऊ शकतो, जो चीनसाठी देखील हानिकारक असेल, असे जागतिक तज्ज्ञांना वाटते.





