‘अक्षय शिंदे याने बलात्कार केलाच नाही’; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा

Jitendra Awhad | बदलापूर येथील दोन शाळकरी बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मात्र, या चकमकीला पोलीसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिला. यातच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेबाबत मोठा दावा केला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, की पोलिसांना बदनाम केलं जातंय. अक्षय शिंदेला ज्या अंतरावरून गोळी मारली ते अंतर हास्यास्पद आहे. त्याच्या हाताला बेड्या होत्य. मग तो कोणता रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातून काढणार? आता तर हेही सिद्ध झालंय की त्या रिव्हॉल्वरवर अक्षय शिंदेचे ठसेच नाहीत. हे प्रकरण बलात्काराचं असल्याने लोक बोलायला घाबरतात. पण अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही.
हेही वाचा : महिन्याभरात मोठा राजकीय भूकंप? संजय शिरसाटांचा मोठा दावा
अक्षय शिंदेची हत्या झाली : जितेंद्र आव्हाड
बलात्कार केलेल्यांना सोडवण्याकरता अक्षय शिंदेची हत्या झाली. बलात्कार केलेले कोण होते? जे मी जात वर्चस्ववादाची लढाई म्हणतोय, अक्षय शिंदेची हत्या झाल्यानंतर ते लगेच हजर झाले. यातील सर्वात मोठी गोष्ट असते माणसाची मेमरी शॉर्ट आहे. या एकाच गेमवर सरकार खेळत असतं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अक्षय शिंदेला जिथे मारलं तो मतदारसंघ माझा आहे. त्याला जिथे मारलं तिथे बाजूला एक चहावाला उभा होता. त्या चहावाल्याने मला फोन करून सगळं व्यवस्थित सांगितलं. इथे काहीतरी झालंय, फायरिंग झाल्याचा आवाज आल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर अक्षय शिंदेचं दुपारपर्यंत प्रकरण समोर आलं. आता प्रश्न हा आहे की अक्षय शिंदेवर ज्याने गोळ्या झाडल्या त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांची चौकशी करा असं न्यायालयाने म्हटलंय. पण पहिल्याच दिवशी कोर्टाने विचारलं होतं की हे कसं काय होऊ शकतं? हायकोर्टाने स्वतःहून याचिका उचलली होती. प्रश्न हा आहे की अजून पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.





