ताज्या घडामोडीमुंबई
राज ठाकरेंची दुर्गम शाळेला भेट
चिखलदरा – तालुक्यातील रुईपठार या गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. पहिली ते चौथीची एकूण १२, १३ मुले एकाच वर्गात दाटीवाटीने बसलेली त्यांना दिसली. इतर शैक्षणिक समस्या होत्याच, पण प्रकर्षाने जाणवली ती समस्या भाषेची. . . . पण इतर शहरांपेक्षा वेगळ्या प्रकारची.
इथल्या आदिवासी समूहाची मातृभाषा आहे – कोरकू ! जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षणाचं माध्यम आहे मराठी!! आणि, शिक्षक शिकवताना बोलतात – हिंदी!! महाराष्ट्रातला आदिवासी समाज आणि त्यात मध्यप्रदेशला जोडून असलेला मेळघाटचा परिसर, अशा भौगोलिक वातावरणातून निर्माण झालेला हा भाषिक प्रश्न. या गुंत्यामुळे मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होत नाही, अशी विचित्र स्थिती राज यांच्या निदर्शनास आली.
शाळेच्या भिंतीवर शाळा १९६६ साली स्थापन झाल्याचा उल्लेख आहे. पण गावातला पहिला विद्यार्थी ३८ टक्क्यानी दहावी उत्तीर्ण व्हायला दोन हजार साल उजाडावे लागले हे आणखी एक भीषण सत्यही कळले. शाळेच्या वर्गात एक संगणक होता. तो पाहून राज यांनी शिक्षकाला विचारलं की, “याचा की बोर्ड आणि माऊस कुठे आहे? ” या प्रश्नाला “कपाटात ठेवला आहे” हे शिक्षकाने दिलेलं उत्तर आणखी अस्वस्थ करणारं.
गावात कधीही गेलं तरी वीज नसते, पण डिजिटल इंडियामुळे संगणक मात्र तैनात. आश्रमशाळांची स्थिती आणखी भयंकर. शाळेची क्षमता आहे ६०० विद्यार्थ्यांची, आणि प्रत्यक्षात राहताहेत १२०० विद्यार्थी. या दुर्गम भागात मैत्री संस्थेच्या कार्यकर्त्या विनीता ताटके, राम फड हे रचनात्मक कार्य करीत आहेत.