मोटरमनला धुके, वळणामुळे काहीच दिसले नाही
मुंबई : अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील वेगवेगळे पैलु आता समोर येऊ लागले आहे. या ठिकाणी असणारे धुके व वळणामुळे मोटरमनला काहीच दिसू शकले नसल्याचे आता समोर आले आहे. रेल्वेला याठिकाणी होणा-या कार्यक्रमाविषयी काहीही कळविण्यात आले नव्हते व रेल्वेकडून कार्यक्रमासाठी परवानगीही घेण्यात आली नव्हती. अमृतसरमधील स्थानिक प्रशासनाला मात्र या कार्यक्रमाची माहिती होती व त्यासाठी एका मंत्रीमहोदयांची पत्नी उपस्थित राहणार होती.
रेल्वेने या घटनेसाठी स्थानिक प्रशासनालाच जबाबदार धरले असून आमच्या हद्दीलगत होणा-या या कार्यक्रमाविषयी आम्हाला कळविण्याची तसदीही कुणी घेतली नव्हती, असा दावा केला आहे. एवढी मोठी गर्दी असतानाही रेल्वे का थांबली नाही, या प्रश्वावर रेल्वेने मोटरमनला धुके आणि वळणामुळे या ठिकाणी कार्यक्रम सुरु असल्याचे लक्षात आले नसल्याचे म्हटले आहे. रेल्वेची सर्व यंत्रणा घटनास्थळी असून ती बचाव व मदतकार्यात गुंतली असल्याचे त्यांनी सांगितले. अमृतसर महापालिकेनेही आपल्याकडे यासाठी कोणीही परवानगी मागितली नव्हती, असे स्पष्ट केले आहे. वैद्यकीय मदत याठिकाणी करण्यात येत असल्याचेही अमृतसरच्या आयुक्त सोनाली गिरी यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातलगांना दोन लाखाची तर जखमींना ५० हजाराची मदत जाहीर केली आहे. दरम्यान रेल्वेने यात कोणीच प्रवासी नसल्याने तांत्रिक कारणामुळे आपल्याला मदत करता येणार नसल्याचे म्हटले आहे.