“इधरकू तुम्हारा कोई कामा नहीं”, फडणवीसांकडून हैदरबादी भाषेत ओवैसींना चिमटा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या मालाड व जोगेश्वरीमध्ये दोन प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभांमधून त्यांनी महाविकास आघाडीसह ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका केली. मालाडमध्ये फडणवीसांनी भाजपा उमेदवार विनोद शेलार यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत ओवैसी यांना त्यांच्याच हैदराबादी भाषेत महाराष्ट्रात येऊ नका असं सांगितलं. तर, गोरेगावचे भाजपा उमेदवार विद्याताई ठाकुर व वर्सोवाचया भाजपा उमेदवार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या प्रचारार्थ जोगेश्वरी पश्चिम, मुंबई येथे देखील जाहीर सभा घेऊन विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हल्ली ते ओवैसीदेखील (हैदराबादचे खासदार व एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी) आपल्या राज्यात, इथल्या मतदारसंघांमध्ये येऊ लागले आहेत, फिरू लागले आहेत. मला त्यांना सांगायचं आहे, मेरे हैदराबादी भाई, उधरी रहना, इधरकू मत आना, इधरकू तुम्हारा कोई कामा नहीं (माझ्या हैदराबादी भावा, तू तिकडेच थांब, इथे येऊ नको, इथे तुझं काही काम नाही.) मला एक गोष्ट कळत नाहीये इथे नेमकं काय चाललंय? इथे येऊन आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. औरंगजेबाचं महिमामंडन केलं जातंय. त्या लोकांना मला सांगायचं आहे की भारताचा जो सच्चा मुसलमान आहे तो औरंगजेबाला आपला हिरो मानत नाही. कारण औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता. त्याने आमच्यावर अनेक आक्रमणं केली आहेत. म्हणून मी म्हणतो, अरे सुन ले ओ ओवैसी, कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर… अब तो तिरंगा लहरायेगा पूरे पाकिस्तान पर!”
हेही वाचा – महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी ‘सायकल व बाईक रॅली’
फडणवीसांनी यावेळी शिवसेना (ठाकरे) पक्ष्पमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, मुंबईतील मराठी माणसाला बेघर करण्याचे काम उबाठाने केले. मी इथे विद्याताई ठाकूर आणि भारतीताई लव्हेकर यांच्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. यापूर्वी मुंबईकरांना केवळ स्वप्ने दाखवली जात होती, काहीही न करता ‘करुन दाखवले’ अशी होर्डिंग्स लावली जात होती. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने ११ वर्षात ११ किलोमीटरची मेट्रो तयार केली. २०१४ मधील आपल्या सरकारने आणि नंतरच्या काळातील महायुती सरकारने पाच वर्षात ३५४ किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे उभारले, त्यापैकी 100 किमीचे काम पूर्णत्वासही आलेले आहे.
मुंबईत आपल्या सरकारने कोस्टल रोड तयार केला. देशातील सर्वात मोठा २२ किमीचा सागरी सेतू बांधला. वांद्रे-वर्सोवा सी-लिंकचे काम आपल्या सरकारने सुरु केले. विरार ते वर्सोवा अशी कनेक्टिव्हिटी आपण आता करत आहोत. खऱ्या अर्थाने मुंबईचा चेहरा बदलण्याचे काम आपण करत आहोत मात्र विकास करत असताना कोळी बांधवांवर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षताही आपण घेतलेली आहे.





