राष्ट्रीय महामार्गांवर सहा महिन्यांत २७ हजार मृत्यू; नितीन गडकरी यांची राज्यसभेत माहिती

नवी दिल्ली | राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात अपघाती मृत्यू होत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये २६ हजार ७७० जणांचा मृत्यू झाला असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. लिखित उत्तरात गडकरी यांनी सांगितले की, २०२४ मध्ये राष्ट्रीय महामार्गांवर एकूण ५२,६०९ घातक अपघात नोंदवले गेले.
नितीन गडकरी म्हणाले, की गेल्या वर्षी राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या ५२ हजार ६०९ इतकी जास्त होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्ग, ‘ट्रान्स-हरियाणा’, ‘इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेसवे’, दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग अशा जास्त वाहतूक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती मार्गांवर प्रगत वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा (एटीएमएस) उभारण्यात आली आहे.
हेही वाचा : पुढील २४ तासांत पाऊस हाहाकार माजवणार, पुण्यासह ‘या’ ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर
राष्ट्रीय राजधानी प्रदेशात (एनसीआर) जुन्या वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने नव्हे तर राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) घेतला होता असे गडकरी यांनी अन्य एका प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये सांगितले. सरकारच्या वाहन मोडीत काढण्याच्या धोरणामध्ये १५ वर्षे जुनी वाहने वापरण्यावर बंदी घातलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. एनजीटीने २०१५मध्ये दिलेल्या आदेशाचे पालन करत एनसीआरमध्ये १० वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहने आणि १५ वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहने न चालवण्याचे पालन केले जावे असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.
आर्थिक वर्ष २०२५मध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या बांधणीचा वेग २९ किमी प्रतिदिन इतका कमी झाला आहे असे गडकरी यांनी बुधवारी लेखी उत्तराद्वारे संसदेला कळवले. २०२३-२४मध्ये हा वेग प्रतिदिन ३४ किमी इतका होता, तर सर्वाधिक वेग २०२०-२१मध्ये गाठण्यात आला होता. त्यावर्षी प्रतिदिन ३४ किमी राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम झाले होते असे गडकरी यांनी सांगितले.





