‘बिश्नोई समाजाची माफी मागा’; सलमान खानला भाजपा नेत्याचा सल्ला

Salman Khan | राष्ट्रावादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (१२ ऑक्टोबरला) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने घेतली आहे. यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपा नेते हरनाथ सिंह यादव यांनी सलमानला बिश्नोई समाजाची माफी मागावी असा सल्ला दिला आहे.
हरनाथ सिंह यादव हे भाजपाचे माजी राज्यसभा खासदार आहेत. त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत सलमानला बिश्नोई समाजाची माफी मागण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, प्रिय, सलमान खान..बिश्नोई समाज ज्याला देव मानतो, त्या काळवीटाची तुम्ही शिकार केली आणि तुम्ही ते शिजवून खाल्लं. त्यामुळे बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि मागच्या बऱ्याच वर्षांपासून तुमच्याबद्दल त्यांच्या मनात नाराजी आहे. माणसाकडून चुका होतात, तुम्ही मोठे अभिनेते आहात, देशात मोठ्या संख्येने लोक तुमच्यावर प्रेम करतात. त्यामुळे तुम्ही बिष्णोई समाजाच्या भावनांचा आदर करून तुमच्याकडून झालेल्या मोठ्या चुकीबद्दल बिश्नोई समाजाची माफी मागावी, असा माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला आहे.
हेही वाचा – ‘आमच्या लढ्याला यश’; टोलमाफीच्या निर्णयावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
https://x.com/harnathsinghmp/status/1845464343699145027
दरम्यान, अभिनेता सलमान खानने एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजस्थानमध्ये १९९८ साली दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप झाला होता. यासंदर्भात त्याच्याविरोधात खटला दाखल झाला आणि अनेक वर्षांच्या सुनावणीनंतर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तेव्हापासून बिश्नोई गँग सलमान खान जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. एप्रिल २०२४ मध्ये सलमान खानच्या मुंबईतील घरावर गोळीबार करण्यात आला होता, त्याला सतत ई-मेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या येतात.





