शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे ६८ टक्के काम पूर्ण; वाहतूक कोंडीमधून होणार सुटका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-85-780x470.jpg)
पिंपरी : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. या मेट्रो मार्गाचे काम येत्या दोन वर्षांत म्हणजे २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या त्याचे ६८ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे, वाकड, हिंजवडी परिसरातील नागरिकांना पुण्यात जाणे-येणे सोयीचे होणार आहे. सर्व कामे जलदगतीने सुरू आहेत. या मेट्रो मार्गामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीमधून बऱ्याच अंशी सुटका होणार आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी-माण या तिसऱ्या मेट्रो मार्गाच्या कामासाठी वाकड आणि हिंजवडी (फेज १) या भागात गर्डर आणि खांबावर पिअर कॅप बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. माण-हिंजवडी-शिवाजीनगर हा २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडे या प्रकल्पाचे संनियंत्रण आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हे काम हाती घेतले आहे.
या प्रकल्पासाठी ८ हजार ३१३ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे खांब बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. स्थानक उभारणी सुरू आहे. रूळ बसविण्याचेही काम सुरू झाले आहे. त्याचे आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
मेगापोलिस सर्कल, एम्बेसी क्चाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज २, विप्रो फेज २, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंधान, सकाळनगर, विद्यापीठ, आरबीआय, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर आणि दिवाणी न्यायालय आदी.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचा हा मार्ग पूर्ण झाल्यास पुणे आणि परिसरातून हिंजवडी आयटी पार्कमध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. अवघ्या ३५ ते ४० मिनिटांत या मार्गावर प्रवास करता येणार आहे.