![Jadeja, over the dismissal, controversy, ignited, Teams, coaches, face-to-face,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/jadeja-780x470.jpg)
नवी दिल्ली : चेन्नईचा अष्टपैलु खेळाडू रविंद्र जडेजाला पंचांनी बाद दिलेल्या निर्णयाची जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्ये आता चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचे प्रशिक्षक आता आमने सामने आले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये आता एक मोठा वाद तयार झाला आहे.
नेमकं घडलं तरी काय होतं, जाणून घ्या…
१६ व्या षटकात जडेजा व ऋतुराज गायकवाड फलंदाजी करत होते. ऋतुराज व जडेजा यांच्यात बरोबर संपर्क न झाल्याने ऋतुराज धाव घेण्यासाठी पळाला पण जडेजाने दुसरी धाव घेण्यास नकार दिला. तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने विकेटकिपर संजू सॅमसनच्या दिशेने चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू फेकत असताना जडेजा मधून धावत होता त्यामुळे चेंडू जडेजाच्या पाठिला लागला. राजस्थानने तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली व पंचाने जडजाला बाद करण्याचा निर्णय दिला.
चेन्नईचे फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी काय म्हणाला पाहा…
चेन्नई सुपरकिंग्सचे फलंदाजीचे प्रशिक्षक माइकल हसी यांनी सामन्यानंतर या निर्णयावर निष्पक्षतेने आपली बाजू मांडली. ज्यात त्यांनी म्हटले की, ” जर राजस्थान व जडेजा या दोघांच्या बाजूने विचार केला तर पंचांचा निर्णय काहीही असु शकला असता. मी बरोबर बघितले नाही. जडेजाना माघारी फिरायचा प्रयत्न केला त्यामुळे त्याची दिशा थोडी बदलली. पण तो जेव्हा सरळ धावत होता तेव्हा त्याने दिशा बदलली नव्हती. मी दोन्ही पक्षाची बाजू समजू शकतो. मी पंचाद्वारे दिलेला निर्णय समजू शकतो. नियम सांगतो की, तुम्ही तुमची दिशा नाही बदलू शकत त्यामुळे हा निर्णय योग्य होता. चेन्नईसमोर कमी धावांचे लक्ष्य होते त्यामुळे चेन्नईला पाच विकेट्स राखून विजय मिळवणे शक्य झाले. चेन्नईच्या विजयामुळे त्यांची प्लेऑफमधील जागा निश्चित होण्याची शक्यता आहे.
राजस्थानचा प्रशिक्षक कुमार संगकारा काय म्हणाले पाहा…
राजस्थान रॉयलचे प्रशिक्षक व माजी क्रिकेटर कुमार संगकाराने म्हटले की, ” नियम सांगतो की जर फलंदाज आपली दिशा बदलत, चेंडू फेकताना मध्ये आल्यास हा अडथळा समजला जाईल. काही वर्षापूर्वी याच निर्णयामुळे नियम बदलण्यात आले. जरी तुम्ही मधून धावत असाल व चेंडू तुमच्या अंगाला लागला तरी त्याला बादच केले जाणार. जडेजा जर जिथे उभा होता त्याच दिशेने धावला असता तर काही अडचणच निर्माण झाली नसती.”
चेन्नईसाठी सर्वात जास्त विकेट्स घेत वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंह याने चांगली कामगिरी केले. त्याने ३६ धावा देत ३ विकेट घेत आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. हसी गोलंदाजीबाबत म्हटले की, ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे की आमच्याकडे खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. आमच्याकडे चांगले गोलंदाज असल्याकारणाने सिमरजीतला संधी मिळाली नव्हती. त्याला संधी मिळाल्याने मी खूप खूश आहे आणि त्याने चांगली गोलंदाज करत स्वतःला सिद्ध केले. तो अधिक मेहनत घेत आहे आणि जेव्हा त्याना संधी मिळाली आहे त्याने चांगली कामगिरी केली आहे.