पुनावळे कचरा डेपो : स्थानिक रहिवाशांमध्ये चिंता; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या निर्णयाकडे लक्ष!
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव: कचरा डेपोला पर्यायी जागा उपलब्ध करण्याच्या निर्णयाला मुहूर्त मिळेना?
पुणे: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (पीसीएमसी) ने पुनावळे परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्यामुळे पनावळेकर चिंतेत आहेत. या प्रकल्पाला सर्व स्तरातून विरोध असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेतात? याकडे स्थानिक रहिवशांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपोसाठी पर्यायी जागा उलपब्ध करण्याबाबत मागणी केली होती. त्यावर प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश संबंधित विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र, अद्याप काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता असून, आंदोलन तीव्र करण्याची तयारी सुरू आहे.
महिनाभरापूर्वी, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पीसीएमसीमध्ये बैठक घेतली होती. त्यावेळी पुनावळेतील कचरा डेपोला पर्यायी जागा उपलब्ध करण्यासाठी पाहणी करावी, अशी सूचना प्रशासनाला केली होती. मात्र, त्यावरही प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे पुनावळेचा कचरा डेपोवरून स्थानिक नागरिक आणि प्रशासन असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुनावळे येथील रहिवासी सुशांत लोभे म्हणाले, “आम्ही पुनावळे (पिंपरी चिंचवड) येथील रहिवासी आहोत आणि पुनावळे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या बांधकामाबाबत पीसीएमसीने घेतलेल्या निर्णयाबद्दल आम्ही चिंतित आहोत. सध्या पुनावळे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून ते अजूनही सुरू आहे. पुनावळे येथे सध्या १ लाखाहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत, नैसर्गिक वातावरण आणि शेजारील हिंजवडी आयटी पार्क यामुळे त्यांना येथे राहणे आवडते. मात्र घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे खोळंबा होण्याची वेळ आपल्यावर आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अनेक निवासी सोसायट्यांपासून फार कमी अंतरावर (200 – 400 मीटर) असल्याने यामुळे आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.”
लोभे पुढे म्हणाले की, 2008 मध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर झाला तेव्हा फारसे नागरीकरण झाले नव्हते परंतु आता येथे मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प, शैक्षणिक संस्था, रुग्णालये बांधली गेली आहेत. प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प या सर्वांवर गंभीर परिणाम करू शकतो.
याशिवाय, प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जंगलाला लागूनच बांधण्याचे नियोजन असल्याने नैसर्गिक सौंदर्याचा नाश होणार आहे. प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पश्चिम दिशेला आहे. वारे नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि त्यामुळे वाकड, ताथवडे, हिंजवडी आयटी पार्क, मारुंजी, पुनावळेसह मुंबई पुणे महामार्ग यांसारख्या आधीच विकसित झालेल्या भागांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटीज फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख म्हणाले, “पीसीएमसी असे सांगते की निवासी सोसायट्यांनी सोसायटीच्या आवारातच कचरा टाकला पाहिजे. मग कचरा डम्पिंग ग्राऊंडची गरज का भासली हा मोठा प्रश्न आहे. ज्या भागात हे डम्पिंग ग्राउंड पीसीएमसीने प्रस्तावित केले आहे, त्या परिसरात सर्व रहिवासी सोसायट्या आहेत. त्यामुळे डम्पिंग ग्राऊंडबाबतच्या निर्णयावर पीसीएमसीने फेरविचार करावा. त्याऐवजी, निगडीप्रमाणेच एक उद्यान + जलशुद्धीकरण प्रकल्प पीसीएमसीच्या पश्चिमेकडील भागात करणे आवश्यक आहे. पाण्याचा प्रश्न संपेल. मी एका बैठकीत असे सुचवले होते की क्लस्टरनिहाय कचरा वर्गीकरण करणे आवश्यक आहे. अशा अनेक खाजगी कंपन्या आहेत ज्या कचऱ्याचा वापर ऊर्जा संसाधने तयार करण्यासाठी करतात. पीसीएमसी असेच का करत नाही? त्यासाठी जास्त जागाही लागत नाही. फक्त ५ एकर जागा पुरेशी आहे. सध्या, पुनावळे येथील ती जमीन, जिथे कचरा डंपिंग ग्राउंडची योजना आहे, ती वनविभागाची आहे. ज्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे तो सरकार त्यांच्या ताब्यात घेईल. जमीन अधिग्रहित केल्यानंतर, ती डंपिंग ग्राउंडसाठी वापरण्याऐवजी, सरकार ती खाजगी बिल्डरला विकू शकते.
लोभे पुढे विनंती करतात की या सर्व बाबी आणि पुनावळे व परिसरातील नागरिकांचा विचार करून पुनावळे परिसरात येणारा हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रद्द करण्यात यावा जेणेकरून सर्व नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही.





