अजित पवारांच्या वक्तव्यानंतर चित्रा वाघ यांची शिंदे-फडणवीसांकडे मोठी मागणी
अजित पवारांसारख्या प्रगल्भ नेत्याने धर्मवीर म्हणून नका म्हणणे दुर्दैवी
मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेचं तापले आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असे वादग्रस्त विधान केल्यामुळे अनेक राजकीय नेते त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केलीय.
छत्रपती संभाजी महाराज हे धर्माच्या रक्षणासाठी मुघलांना सामोरे गेले. त्यामुळे अजितदादां सारख्या प्रगल्भ नेत्याने धर्मवीर म्हणून नका म्हणणे दुर्दैवी आहे. राज्यामध्ये आजवर एवढी सरकारे आली आणि गेली, परंतु शिंदे- फडणवीस यांच्या सरकारने औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर केलं. केंद्राकडे पाठपुरवा करून ते मान्य करून घेतील. मात्र आता माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर नाही तर धर्मवीर संभाजीनगर करा, अशी मागणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या.
सोबतच, अजितदादांनी जे विधान केलं त्याबद्दल खरंतर त्यांना हिंदुस्थानातून हाकलून दिलं पाहिजे. पाकिस्तानमध्ये त्यांची रवानगी केली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्या नेत्याला माहीत नाही ते महाराष्ट्राचं दुर्देव आहे, असं वक्तव्य भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केलं आहे.
विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजेंबाबत केलेल्या वक्तव्याचा नवी मुंबई भाजपाच्या महिला मोर्चाकडून निषेध व्यक्त कऱण्यात आला. यावेळी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.