ऐन सणासुदीत तीळ महाग
पुणे : ऐन सणासुदीत आणि हंगामाच्या तोंडावरच तीळ महाग झाले आहे. राजस्थान, मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे तिळाच्या लागवडीवर परिणाम झाला असून यंदाच्या हंगामात तिळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता तीळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांत तिळाच्या दरात किरकोळ बाजारात प्रतिकिलोमागे ५० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे.
ऑक्टोबर महिन्यात तिळाचा हंगाम सुरू होतो. त्यानंतर ऑक्टोबरपासून डिसेंबपर्यंत हंगाम सुरू असतो. दिवाळी ते संक्रांतीपर्यंत तिळाला चांगली मागणी असते. राजस्थान, मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे तिळाच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या चार राज्यांत तिळाची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. साधारणपणे हंगामात साडेतीन लाख टन एवढे तिळाचे उत्पादन होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात पांढऱ्या तिळाची लागवड केली जाते. गुजरात, राजस्थानात पांढरा तसेच काळय़ा तिळाची लागवड केली जाते, असे गुजरातमधील राजकोट येथील तीळ व्यापारी श्री तिरुपती ब्रोकर्सचे संचालक किसन टण्णा यांनी सांगितले.
भारतातून तिळाची निर्यात युरोप, आखाती देश, चीन, तैवान, कोरिया, अमेरिकेत केली जाते. यंदा राजस्थान आणि मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीस आलेल्या तिळाचे मोठे नुकसान झाले आहे. परदेशातील देशांशी तीळ निर्यातीचे सौदे सुरू झाले आहेत. यंदा तिळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.
भारतीय तिळाला परदेशात मोठी मागणी..
भारतातील पांढरा आणि काळय़ा तिळाला परदेशात मोठी मागणी असते. बेकरी उत्पादनांसाठी त्यांचा वापर होता. दरम्यान, करकोळ बाजारात एक किलो तिळाचे दर १९० ते २०० रुपये आहेत, असे तीळ व्यापाऱ्यांनी सांगितले.
राजस्थान, मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे तीळ खराब झाले आहेत. त्यामुळे यंदा उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.
– किसन टण्णा, तीळ व्यापारी, राजकोट, गुजरात