डोकलामचा वाद राजकीय प्रगल्भतेने सोडवला
राज्यसभेत सुषमा स्वराज यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यात डोकलाम येथे निर्माण झालेला पेच प्रसंग राजकीय प्रगल्भपणातून सोडवण्यात आला असून तेथे जेैसे थे स्थिती निर्माण करण्यात आली आहे अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत बोलताना दिली.
या विषयावर निवेदन करताना त्या म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात वुहान येथे जी अनौपचारीक चर्चा झाली, त्याचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील आपसातले सामंजस्य वाढवणे आणि परस्परांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे हे होते आणि ते बहुतांशी साध्य झाले आहे. दोन्ही नेत्यांमधील ती चर्चा कोणत्याही ्औपचारीक कार्यक्रमाशिवाय आणि कोणत्याही अधिकृत द्विपक्षीय कराराशिवाय झाली.
या नेत्यांच्या बैठकीच्या आधी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली होती त्यात कोणत्याही अधिकृत कार्यक्रम पत्रिकेशिवाय हे नेते एकमेकांना भेटले पाहिजेत, त्यांच्यात होणाऱ्या अनौपचारीक चर्चेमुळेच दोन्ही नेत्यांमधील विश्वासाचे वातावण दृढ होईल असे ठरवण्यात आले होते असेही त्यांनी यावेळी नमूद केले. आम्ही याच मार्गाने काहीही न गमावता डोकलाम मधील वादावर तोडगा काढला आहे. तेथील स्थितीत एक इंचाचाही फरक झालेला नाहीं असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी एका सदस्याने असा आक्षेप घेतला की सभागृहात स्वत: पंतप्रधान उपस्थित आहेत आणि चीनच्या अध्यक्षांशी त्यांनी जी अनौपचारीक चर्चा केली त्यात नेमके काय बोलणे झाले याची सुषमा स्वराज यांना कल्पना नाही कारण त्या स्वत: तेथे उपस्थित नव्हत्या, त्यामुळे पंतप्रधानांनीच यावर हस्तक्षेप करून माहिती द्यावी अशी सुचना या सदस्याने केली परंतु ती सुषमांनी फेटाळून लावली. त्या म्हणाल्या की तेथे झालेल्या चर्चेची पुर्ण माहिती मला आहे आणि मी ती स्वत: सभागृहाला देऊ शकते त्यामुळे स्वत: पंतप्रधानांनी यावर बोलण्याची आवश्यकता नाही.