डाटा संरक्षण कायद्याविषयी राज्यांकडून अभिप्राय मागवले
नवी दिल्ली – संगणकावरील माहितीच्या संरक्षणाच्या संबंधात केंद्र सरकार डाटा संरक्षण कायदा करणार असून त्या कायद्याचा मसुदा सर्व राज्यांना पाठवण्यात येणार आहे. त्यांच्याकडून यावर सुचना आणि अभिप्राय मागवण्यात आले असून त्या अभिप्रायांचा योग्य तो विचार करून या विषयी निर्णय घेतला जाईल अशी माहिती दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. डिजीटल माहिती ही आता गरज बनली असून त्या विषयी समतोल भूमिका घेतली जाईल.
उपलब्ध डाटाचा सुयोग्य वापर, त्याची योग्य ती सुरक्षा याची सांगड घातली जाईल. डिजीटल डाटा वापरणारांची खासगी माहिती फुुटू नये किंवा त्याचा गैरवापर केला जाऊ नये यासाठी हा कायदा केला जात आहे. ते म्हणाले की माहितीचा अधिकार किंवा खासगीपणाचा अधिकार हे दोन्ही अधिकार एकाचवेळी पुर्ण अंशांने वापरले जाऊ शकत नाहीत त्यात समतोल साधण्याची गरज आहे आम्ही तो प्रयत्न करीत आहोत.