संसद सुरळीत चालवण्यासाठी सर्वांनी सहकार्य द्यावे – पंतप्रधानांचे आवाहन
नवी दिल्ली – आजपासून सुरू होणारे संसदचे पावसाळी अधिवेशन सुरळीत चालावे यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या सदस्यांनी सरकारला सहकार्य द्यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक आज सरकारने संसद भवनात आयोजित केली होती त्यावेळी बोलताना त्यांनी हे आवाहन दिले. ते म्हणाले संसद सुरळीत चालली पाहिजे ही जनतेचीच इच्छा आहे. पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनाला सर्वच राजकीय पक्षांनी होकारार्थी प्रतिसाद दिला आहे अशी माहिती सरकारच्यावतीने देण्यात आली आहे.
यावेळी विरोधी पक्ष सदस्यांच्या वतीने उच्चशिक्षण संस्थांमधील अनुसुचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाचा विषय उपस्थित करण्यात आला. समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव म्हणालेकी उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसुचित जातीजमाती आणि अदिवासींना आरक्षण देण्याची स्पष्ट हमी सरकार जो पर्यंत देत नाही तो पर्यंत आम्ही संसद चालू देणार नाही. केंद्र सरकारकडून दिल्ली सरकारला दुजाभावाने वागणूक दिली जात असून पंतप्रधानांनी या प्रकाराचे निराकरण करावे अशी मागणी आम आदमी पक्षाचे नते संजय सिंह यांनी या बैठकीत केली.